बुधवार, 25 जुलाई 2012

तुमच्या, आमच्या आणि त्यांच्या मनातलं!

तुमच्या, आमच्या आणि त्यांच्या मनातलं!
प्रकाश अकोलकर
Thursday, July 26, 2012 AT 03:45 AM (IST)


आपल्या आजारी भावाचं सारथ्य करत राज ठाकरे त्याला "मातोश्री'वर घेऊन गेले आणि तर्क-वितर्कांना ऊत आला. पण प्रश्‍न "एक नंबर'चा आहे. तो सोडवायचा कसा, या लाखमोलाच्या प्रश्‍नाचं उत्तरही तितकंसं अवघड नाही.

"तुमच्या मनात आहे, ते माझ्या मनात नाही!'
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत हे पहिलं वाक्‍य उच्चारलं आणि अनेकांच्या मनातील सुप्त आकांक्षांना आशा-निराशेचे धुमारे फुटले. या अनेकांमध्ये मीडियावालेच फक्‍त होते, असं समजण्याचं कारण नाही. त्यात दोघा भावांनी खरोखरच एकत्र यावं, अशी मनापासूनची इच्छा असलेले अनेक शिवसैनिक आणि मनसैनिक होते. तसंच राज यांना सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्राची सत्ता हाती येणं अशक्‍य आहे, अशी खात्री पटलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्तेही होते. शिवाय, हे दोन्ही भाऊ खरोखरच एकत्र आले, तर त्यांच्या भाऊबंदकीनंतर सुरू झालेली आपली दुकानं बंद होतील, या भीतीनं पोटात गोळा आलेले दोन्ही बाजूंकडील दुकानदारही होते!


शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे "लीलावती'तून बाहेर आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना आपल्या गाडीतून नेले.

राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचं निमंत्रण आलं, तेव्हा "आता मिळालीच आपल्याला "ती' हेडलाईन!' या भावनेनं अनेकांना उचंबळून आलं. खरं तर गेल्याच आठवड्यात मीडियातील एक मोठा समूह "ती' हेडलाइन सूचक पद्धतीनं करून मोकळा झाला होता. गेली सहा-सात वर्षं आपल्याच भावाशी जीव तोडून भांडणारा भाऊ, तोच भाऊ आजारी पडल्यावर त्याला भेटायला गेला आणि अनेक जाणकार मैदानात उतरले. आपल्या आजारी भावाचं सारथ्य करत राज ठाकरे त्याला "मातोश्री'वर घेऊन गेले. अवघा मीडिया या एका दृश्‍यामुळे गहिवरून गेला. दोन भावांचा एकत्र फोटो काढण्यासाठी गेली सात वर्षं वाट बघणाऱ्या तमाम फोटोग्राफरची हा अनुपम क्षण कॅमेराबद्ध करण्यासाठी झुंबड उडाली होती. अर्थात, काही सुज्ञांचा त्यास अपवाद होता आणि "जरा धीरानं घ्या...' असा सल्लाही ते इतरांना देत होते. पण त्यांच्याकडे हेटाळणीच्या नजरेनं बघितलं जात होतं आणि "यांना इतरांचं काही बरं झालेलंही बघवत नाही!' अशी बोटं मोडली जात होती.

गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांनी एकामागोमाग एक गुगली चेंडू टाकून, भले भले राजकीय विश्‍लेषक, टीव्हीवरले बोलघेवडे आणि शिवाय दोन्ही संघटनांतल्या सैनिकांनाही त्रिफळाचित केलं होतं. असाच आणखी एक धक्‍का त्यांनी या पत्रकार परिषदेत "जे तुमच्या मनात आहे, ते माझ्या मनात नाही!' असं वाक्‍य उच्चारून दिला, तेव्हा टीव्हीवरून ही पत्रकार परिषद बघताना शेजारी बसलेले "शिवसेना' या चार अक्षरांनी आजही मोहरून जाणारे आणि संघटनेत पहिल्या दिवसापासून घाम गाळणारे एक माजी आमदार म्हणाले : "पण एकत्र आले, तर "नंबर वन' कोण?'

खरं तर या प्रश्‍नाचं उत्तर सर्वांनाच ठाऊक आहे आणि ते सर्वांनाच मान्य झालं असतं, तर आज या "भाऊबंदकी'च्या खेळातून रोजच्या रोज होणाऱ्या करमणुकीला आपण मुकलो नसतो का? त्यामुळेच "नंबर वन कोण?' या लाखमोलाच्या प्रश्‍नाचं उत्तर न देताही पुढे काय काय होऊ शकतं, याचा विचार करता येतो.

शिवसेना-भाजप युतीनं 1995 मध्ये सत्तेवर येताना मुंबईतील 34 पैकी 31 जागा जिंकल्या होत्या. आता मुंबईतील एकूण आमदारांची संख्या आहे 36 आणि त्यात "मनसे'चे आमदार आहेत सहा, भाजपचे आहेत पाच आणि शिवसेनेचे आहेत अवघे चार! नाशकातले तर तिन्ही आमदार मनसेचेच आहेत. विधानसभेच्या या निवडणुकीनंतर दोन-अडीच वर्षांनी झालेल्या जिल्हा परिषदा आणि नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुकांत या चित्राचे रंग थोडेफार बदलले असले, तरी मूळ ढाचा कायम आहे. पुण्यासारख्या शहरातून मनसे हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून आला आहे. याचा विचार भाजपनं केला आहे आणि त्यामुळेच पुढे काय करावं लागणार आहे, याची त्यांना खात्री आहे. त्याच वेळी आणखी एक बाब लक्षात घ्यायला हवी- राज ठाकरे यांचे गेल्या विधानसभा निवडणुकीत 13 आमदार निवडून आले खरे; पण त्यांनी जागा 140 पेक्षा अधिक लढवल्या होत्या. शिवाय, त्यांचे दोन आमदार -एक कन्नडचे हर्षवर्धन जाधव आणि खडकवासल्याचे (आता दिवंगत) रमेश वांजळे हे ज्या कोण्या पक्षातर्फे उभे राहिले असते, त्या पक्षातर्फे निवडूनच आले असते. या साऱ्याचा विचार राज ठाकरे यांनी केला असेलच. त्यामुळेच जे आपल्या मनात आहे, तेच राज ठाकरे यांच्याही मनात असू शकतंच!
पण प्रश्‍न "एक नंबर'चा आहे. तो सोडवायचा कसा, या लाखमोलाच्या प्रश्‍नाचं उत्तरही तितकसं अवघड नाही. दोन्ही भाऊ वेगळेच राहून "बिझिनेस वा प्रोफेशनल डील' करू शकतात आणि ते डील यदाकदाचित यशस्वी झालंच, तर पुढे काय करायचं तो निर्णय घ्यायची जबाबदारी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सोपवून मोकळं होण्याचा मार्ग उपलब्ध आहेच. त्यामुळेच भाजपचे काही जुने-जाणते कार्यकर्ते "बाळासाहेब फक्‍त शिवसेनेचे नेते थोडेच आहेत, ते तर महाराष्ट्राचे नेते आहेत!' अशी भाषा करू लागले आहेत.

त्यामुळेच "तुमच्या' मनात जे काही आहे, ते उद्धव वा राज यांच्या मनात येतच नसेल, असं त्या दोघांनी छातीठोकपणे सागितलं, तरी त्यावर विश्‍वास कोण ठेवणार



मंगलवार, 24 जुलाई 2012

टोल न भरताच वाहने सुसाट!

टोल न भरताच वाहने सुसाट!
- सकाळ वृत्तसेवा
Wednesday, July 25, 2012 AT 01:30 AM (IST)

नवी मुंबई - राज्यातील पथकरवसुलीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू असल्याने आजपासून टोल भरू नका, असे आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी सर्व टोल नाक्‍यांवर ठाण मांडून वाहनचालकांना टोल न भरण्याचे आवाहन केले. त्यामुळे आज शेकडो वाहनांनी टोल न भरताच टोल नाका ओलांडला.

मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या वाशी टोल नाक्‍यावर नवी मुंबईतील मनसेचे शेकडो कार्यकर्ते ठिय्या देऊन होते. गजानन काळे, कौस्तुभ मोरे, अनंत चौघुले आदी कार्यकर्त्यांनी हातात झेंडे घेऊन "टोल भरू नका' असे आवाहन करणारे फलक दाखवत जोरदार घोषणा दिल्या. "जे वाहनचालक स्वखुशीने टोल देत आहेत, त्यांच्याकडून टोल घ्या; पण जे टोल भरू इच्छित नाहीत त्यांना अडवू नका', असे या कार्यकर्त्यांनी टोलनाक्‍यावरील कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यामुळे बहुतेक वाहने टोल न भरताच रवाना झाली; शंभरातून एखादे वाहनच टोल भरण्यासाठी थांबत होते. तेथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. परिमंडळ एकचे सहायक पोलिस उपायुक्त मुजीब शेख परिस्थितीवर लक्ष ठेवत होते.

आधी चांगले रस्ते द्या!
मुंबईहून नवी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाशी टोल नाक्‍याजवळ मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे टोल न भरण्याचे आवाहन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांचे वाहनचालक आभार मानत होते. खड्ड्यांतून जाताना वाहनांचे कसे नुकसान होते, याबाबतही ते सांगत होते. "आधी चांगले रस्ते द्या, नंतर टोल वसूल करा', अशी मागणी वाहनचालक करत होते.

खारेगावात टोल वसुली थांबली
कळवा येथील खारेगाव टोलनाका हा ठाणे जिल्ह्यातील सर्वांत मोठा टोल नाका आहे. नाशिक, नगर, पुणे (जुन्नर मार्गे) आदी ठिकाणी या टोल नाक्‍यावरूनच जावे लागते. तेथे मनसेने महिनाभरापूर्वी "टोल बंद' आंदोलन सुरू केले होते. त्या वेळी टोलवसुलीला काहीसा फटका बसला होता; मात्र त्यानंतर काही दिवसांनी टोलवसुली जोरात सुरू झाली. मनसे कार्यकर्त्यांनी आज सकाळी पुन्हा या टोल नाक्‍यावर धडक दिली. त्यामुळे टोलवसुली थांबली आहे. ठाण्यातील आनंदनगर टोल नाक्‍यावरील वसुली दिवसभर बंद होती.

मुलुंड टोल नाक्‍यावर आंदोलन फसले
मुंबईतील मुलुंड टोल नाक्‍यावर मनसेच्या 30 ते 35 कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पोलिसांनी 10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. हा टोल नाका आज सुरूच होता. मनसेच्या विरोधामुळे सकाळी काही वेळ वाहने टोल न देताच गेली; पण नंतर "ये रे माझ्या मागल्या' अशीच स्थिती होती. तेथे महिनाभरापूर्वी मनसेचे आमदार शिशिर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन फसले होते. त्या वेळी टोलवसुली करणाऱ्या कंपनीने वाहनांची मोजदाद करण्यासाठी आलेल्या मनसे कार्यकर्त्यांना जागाही दिली नव्हती.

दहिसर टोल नाका
उत्तर मुंबईतील दहिसर टोल नाक्‍यावर आज सकाळी मनसेच्या 250 ते 300 कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. काही जणांनी वाहने थांबवून टोल भरू नका, अशी दमदाटीही केली. जमावबंदीचा आदेश मोडून आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर जामिनावर सोडण्यात आले.

रायगड जिल्ह्यात आंदोलन सुरू
रायगड जिल्ह्यातील टोल नाक्‍यांवर आंदोलन सुरू असल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष मनीष खवले यांनी अलिबाग येथे सांगितले. मनसेचे कार्यकर्ते मुंबई-पुणे एक्‍स्प्रेसवे, शेंडुंग, कोन, उरण, अलिबाग-धरमतर, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा पूल, आपटा फाटा येथील टोल नाक्‍यांवर ठाण मांडून आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. जिल्ह्यातील टोल नाक्‍यांवर मनसे कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आहे.

धरमतरमध्ये टोल धुडकावला
पेण तालुक्‍यातील धरमतर टोल नाक्‍यावर मनसेच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांनी घोषणा देत टोलवसुलीस विरोध केला. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी त्यामुळे टोल न घेताच वाहने सोडली. या आंदोलनात शालम पेणकर, मनोहर पाटील, अंकुश म्हात्रे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते



Raj Thakre Press conference about toll


आजपासून टोल भरू नका -राज ठाकरे

आजपासून टोल भरू नका -राज ठाकरे
- सकाळ वृत्तसेवा
Tuesday, July 24, 2012 AT 11:52 AM (IST)

मुंबई- राज्यातील पथकर नाक्‍यांवर (टोल नाके) मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरू आहे. टोल वसुलीत कुठलीही पारदर्शकता नसून जनतेला केवळ ओरबडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे जनतेने आजपासून टोल भरू नये, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) केले.

पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले,""राज्यातील टोल नाक्‍यांची मनसेच्या कार्यकर्त्यांची काही दिवस पाहणी केली. तेथे दररोज येणारी वाहने आणि त्यांच्याकडून वसूल केला जाणारा टोल, याची नोंदणी केली. यावरून असे आढळून आले, की राज्यातील टोल नाक्‍यांवर सुरू असलेल्या टोल वसुलीत प्रचंड गैरव्यवहार सुरू आहे. टोल वसुलीत कुठलीही पारदर्शकता नाही. राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांना धाब्यावर बसवून टोल वसुली करीत जनतेची लूट करण्यात येत आहे. दोन टोल नाक्‍यांमध्ये 35 किलोमीटर अंतर असणे कायद्याने बंधनकारक असतानाही हा नियम पाळला जात नाही. टोल वसुलीतून जमा होणारा पैसा कुठे आणि कसा खर्च केला जातो, याची माहिती सरकारने आम्हाला दिलेली नाही. त्यामुळे जनतेने आजपासून टोल देणे बंद करावे. जनतेकडून जबरदस्तीने टोल वसूल करण्याचा प्रयत्न झाल्यास आमचे कार्यकर्ते टोल नाक्‍यांवर उभे राहतील. आम्हाला सरकारसोबत कुठलाही संघर्ष नको. परंतु, सरकारने बळजबरी केली तर तीव्र आंदोलन उभे करण्याची आमची तयारी आहे.''

राज पुढे म्हणाले,""मुंबई-पुणे मार्गांवर वसूल केला जाणारा टोल राज्यातील शिक्षकांच्या पगारांपेक्षा जास्त आहे. या रस्त्यांच्या बांधकामासाठी जेवढा पैसा खर्च करण्यात आला त्यापैकी जास्त टोल वसूल केला गेला आहे. ही केवळ जनतेचे लूट आहे.''

पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली भेट आणि कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील संघर्षावर बोलण्याचे टाळले