बुधवार, 17 फ़रवरी 2010

अणुऊर्जा प्रकल्पांना विरोध कृतीतून दाखवू - राज ठाकरे

अणुऊर्जा प्रकल्पांना विरोध कृतीतून दाखवू - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Thursday, February 18, 2010 AT 12:30 AM (IST)


चिपळूण - "कोकणचा विकास करण्यासाठी इतर अनेक पर्याय असताना केवळ अणुऊर्जा प्रकल्पच कोकणच्या माथी का मारले जात आहे ? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अणुऊर्जा प्रकल्पांना असलेला विरोध कृतीतून दाखवू'', असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत सरकारला दिला.

ते म्हणाले, ""अमेरिकेत 1973 नंतर दोन अणुऊर्जा प्रकल्पांना राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मान्यता दिली आहे. पण या प्रकल्पांना अमेरिकेच्या सिनेटने अजून मान्यता दिलेली नाही. चीनमध्ये अणुबॉम्बचा स्फोट झाल्यापासून कायदे कडक करण्यात आले आहेत. एखाद्या प्रदेशात अणु प्रकल्प साकारायचा असेल तर त्याला इंटरनॅशनल लॉ ची परवानगी घ्यावी लागते. लोकसभेत अद्यापपर्यंत तसा प्रस्तावही मांडण्यात आलेला नाही. अणुऊर्जा प्रकल्पांविषयी केंद्र सरकारकडून योग्य माहिती दिली जात नाही. असे असताना जमीन संपादित करण्याचा डाव का रचला जात आहे, महाराष्ट्राचे नेते का गप्पा आहेत.''

महाराष्ट्राला भारनियमन मुक्त करण्यासाठी वीज उत्पादनाची मोठी गरज आहे. त्यासाठी एकट्या कोकणमध्ये 21 ऊर्जा प्रकल्प आणणे हा पर्याय असू शकत नाही. कोकणची जमीन सुपीक आहे. शेतीसाठी योग्य असलेल्या या जमिनीत प्रकल्प उभारण्यापेक्षा नापिक जमिनीत अणुऊर्जा प्रकल्प उभारा. अणुऊर्जा प्रकल्पातून कोकणचा कोळसा करण्यापेक्षा येथे येणारे प्रकल्प राज्याच्या विविध भागात विभागून द्या. समुद्रकिनारा नसलेल्या प्रदेशामध्ये प्रकल्प कसे उभे राहिले. डहाणुमध्ये रिलायन्स कंपनीने 100 टक्के प्रदूषण मुक्त वीज प्रकल्प उभारला आहे. त्याची माहिती मी घेतली आहे. अशा प्रकारचे प्रकल्प सरकारने हाती घेतले तर आम्ही सरकारच्या निर्णयाचे स्वागत करू; मात्र अणुऊर्जा प्रकल्पांना मनसेचा विरोध असेल आणि तो आम्ही कृतीतून दाखवून देऊ, असे त्यांनी सांगितले

मंगलवार, 16 फ़रवरी 2010

राहुल गांधींचा मुंबई दौरा म्हणजे 'पॅकेज डील' - राज ठाकरे

राहुल गांधींचा मुंबई दौरा म्हणजे 'पॅकेज डील' - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, February 17, 2010 AT 01:00 AM (IST)


रत्नागिरी - "कॉंग्रेसच्या राहुल गांधींचा मुंबई दौरा हा ठरवून केलेले "पॅकेज डील' आहे. या दौऱ्यात त्यांनी केलेली राजकीय वक्‍तव्ये म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. त्यांचा दौराही शाहरूख खानसारखाच ठरवून केलेला वाटला,'' अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याची खिल्ली उडविली.

मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यासाठी रत्नागिरीत आलेल्या राज ठाकरे यांची शासकीय विश्रामगृहात पत्रकारांनी भेट घेतली. सुरवातीलाच मी पत्रकार परिषद घेत नाही. तुम्ही प्रश्‍न विचाराल तर त्याची मी नक्‍कीच उत्तरे देईन, असे सांगून प्रस्तावना टाळली. राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर राज ठाकरे यांनी वक्‍तव्य केले नव्हते; मात्र काही काळ गेल्यानंतर आज रत्नागिरीत त्यांना पत्रकारांनी छेडले असता त्यांनी राहुल गांधींचा दौरा हा ठरवून केल्याचे सांगत त्यांची खिल्ली उडविली.

माडबन आणि एकूणच ऊर्जा प्रकल्पांबाबत त्यांची भूमिका ही सावधपणाची होती. ते म्हणाले, ""ऊर्जा प्रकल्प हे काळाची गरज आहे. त्यामुळे लोकांचा विरोध का आहे याचा अभ्यास करण्याची गरज आहे. माडबन प्रकल्पामुळे होणाऱ्या धोक्‍याविषयी तेथील लोकांना माहिती दिली पाहिजे. अमेरिकने हे प्रकल्प का बंद केले याचाही अभ्यास करण्याची गरज आहे. दुसऱ्याने टाकून दिलेल्या गोष्टी उचलायला काही महाराष्ट्र लुळा-पांगळा नाहीय. ज्या प्रकल्पांना विरोध करायचा त्यांना मनसे स्टाईलने विरोध नक्‍कीच करणार.''

संघटनेतील फेरबदलासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सध्या कोणतेही बदल करणार नसल्याचे सांगितले. पदाधिकारी हे तरुण, उमेदीचे आहेत. त्यांच्याकडे अनुभव नाही. ती कमी पूर्ण झाली तर ते उत्तम काम करू शकतील. संयम ठेवून काम करीत आहेत. त्यामुळे भविष्य चांगले आहे, असे श्री. ठाकरे यांनी स्पष्ट केले. सुरक्षिततेमध्ये पोलिस कमी पडत आहेत का याविषयी विचारले असता ते म्हणाले, ""याला पोलिस जबाबदार आहेत, असे म्हणता येणार नाही. सरकारचे धोरणच नसल्यामुळे सुरक्षिततेचा मुद्दा पुढे येत आहे. त्यासाठी मुळात योग्य धोरण ठरविण्याची गरज आहे.''

"ती' रेकॉर्ड जुनी
ऑस्ट्रेलियाच्या संघाला खेळू देणार असा इशारा दिल्यानंतर बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार भेट हा विषय दुसरीकडे फिरविण्याचा प्रकार आहे. या पार्श्‍वभूमीवर बाळासाहेब ठाकरेंची काल (ता. 15) काही वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झालेली ती रेकॉर्डही पवार यांच्या भेटीपूर्वीची असल्याचा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी केला आहे. याविषयी आजच सकाळी मला मुंबईच्या काही पत्रकारांनी ही माहिती दिल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामध्ये किती सत्य आहे हे मला माहिती नाही, असे सांगतानाच यावरून खेळाडूंना खेळायला देणार नाही ही धमकी एक प्रकारे गंमतीशीर असल्याचा टोलाही लगावला

मुंबईवर मराठी तरुणांचाच हक्क - राज ठाकरे

मुंबईवर मराठी तरुणांचाच हक्क - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 16, 2010 AT 12:45 AM (IST)

कणकवली - "राज्यात वेगवेगळे उद्योग येऊनही त्यात स्थानिकांना नोकऱ्या मिळत नाहीत. स्थानिकांना त्यांचा हक्क मिळावा, यासाठीच आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर मराठी माणसाचा, इथल्या तरुणांचा पहिला हक्क असल्याची भूमिका घेतली आहे,'' असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केले.

श्री. ठाकरे गेले दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज ते येथे आले होते. या वेळी आमदार शिशिर शिंदे, कोकण संपर्कप्रमुख शिरीष सावंत, जिल्हा सपंर्कप्रमुख उदय सावंत, जिल्हाध्यक्ष राजन दाभोळकर आदी उपस्थित होते. श्री. ठाकरे यांचे येथे जोरदार स्वागत झाले. देवगड, वैभववाडी, कणकवलीहून शेकडोंनी तरुण त्यांना भेटण्यासाठी आले होते. येथील पटवर्धन चौकात मिरवणूक काढण्यात आली. शासकीय विश्रामगृहावर त्यांनी तिन्ही तालुक्‍यांतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यानंतर माहिती देताना श्री. ठाकरे म्हणाले, ""सिंधुदुर्गात मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आमची संघटना निश्‍चितच आकार घेईल. पक्षातील तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण येथे आलो होतो. येत्या काळात कार्यशाळा घेणार आहे. राज्यभरात पक्ष सभासद नोंदणी पंधरवडा येत्या 21 तारखेपासून सुरू होत आहे. यात जास्तीत जास्त सभासद होतील.''

ते म्हणाले, ""राज्य सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. कोण कधी येते, कसे येते, हे समजतच नाही. परिणामी बॉंबस्फोट होत आहेत. राज्यात विविध उद्योग येत आहेत. या उद्योगांमध्ये महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळत नाही. तो मिळावा म्हणून आपण मुंबईवर मराठी माणसाचा हक्क आहे, अशी भूमिका घेतली आहे.''

राज्यातील ग्रामीण भागात विविध समस्या आहेत. याबाबत आपले मत काय, असे विचारले असता श्री. ठाकरे म्हणाले, ""मुंबईत मोठ्या प्रमाणात रोजगार आहेत; पण हे रोजगार परप्रांतीयांच्या हातात जात आहेत. रोजगार नसल्याने विविध प्रश्‍न राज्यात निर्माण होत आहेत. त्यासाठी मराठी आपल्याला वाचवावी लागेल. राज्य सरकारने मुंबईत साडेचार हजार परवाने टॅक्‍सीसाठी देणे जाहीर केले. यावर मराठी माणसाचा हक्क राहिला पाहिजे. यापुढे सर्वच निवडणुकांमध्ये पक्ष उतरणार नसून जेथे संधी मिळेल तेथे योग्य उमेदवार देऊन निवडणूक लढण्याचा प्रयत्न राहील.''

तरुणाईचा प्रतिसाद
राज ठाकरे यांच्या भूमिकेवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणही सहमत असल्याचे चित्र होते. जिल्ह्यातील दौऱ्यात त्यांना भेटण्यासाठी तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. विशेषतः म्हणजे विशीतील तरुणांचा सहभाग यात जास्त होता.

सोमवार, 15 फ़रवरी 2010

राज ठाकरेंचे कणकवलीत स्वागत

कणकवली - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज सकाळी साडेअकरा वाजता येथे जल्लोषी स्वागत करण्यात आले. कणकवली, देवगड, वैभववाडी येथील कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून तसेच ढोल-ताशांच्या दणदणाटात स्वागत केले. तत्पूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी येथील पटवर्धन चौकापासून शासकीय विश्रामगृहापर्यंत मिरवणूकही काढली.

मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे प्रथमच येथे येत असल्याने मनसे कार्यकर्त्यांबरोबरच शहरवासीयांमध्येही उत्सुकता होती. सकाळी नऊपासूनच शासकीय विश्रामगृह येथे देवगड, कणकवली आणि वैभववाडीतील मनसे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. शहरात वातावरणनिर्मितीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी अप्पासाहेब पटवर्धन चौक ते शासकीय विश्रामगृह अशी ढोल-ताशांच्या दणदणाटात मिरवणूकही काढली. मनसे कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफाही यात समाविष्ट होता. मालवण येथून निघालेले राज ठाकरे शासकीय विश्रामगृहावर साडेअकरा वाजता आले. या वेळी त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांचा गराडा पडला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर फटाक्‍यांची आतषबाजीही झाली. "राज ठाकरे झिंदाबाद।।'च्या घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या. मनसेचे कोकण संपर्कनेते शिरीष सावंत, संपर्कप्रमुख उदय सावंत, जिल्हाध्यक्ष राजन दाभोळकर, सहसंपर्कप्रमुख गुरुदत्त काडगे, विजयानंद पेडणेकर, सुधीर जाधव आदींनी श्री. ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी श्री. ठाकरे यांचे आरती ओवाळून स्वागत केले. त्या नंतर कार्यकर्त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार करीत श्री. ठाकरे यांनी तडक शासकीय विश्रामगृह गाठले. दरम्यान, राजना पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनीही शासकीय विश्रामगृहावर गर्दी केली होती.