शुक्रवार, 20 नवंबर 2009

शिवसेनेच्या मांडवात राज ठाकरेंचाच बोलबाला

सकाळ वृत्तसेवा
Friday, November 20, 2009 AT 02:10 PM (IST)


ठाणे - ते येणार आहेत... ते नक्की येणार आहेत, अशा कुजबुजीला अखेर नऊच्या सुमारास विराम मिळाला. सुटाबुटातील राज ठाकरे यांचे आगमन झाल्यावर ते आले, त्यांनी पाहिले आणि ते जिंकून निघून गेले, असा अनुभव उपस्थित बहुतांश लोकांना आला. "शिवसेनेच्या मांडवात मनसेचाच बोलबोला' अशी स्थिती कल्याणचे खासदार आनंद परांजपे यांच्या भावाच्या लग्नमंडपात पाहावयास मिळाली.

आनंद परांजपे यांचे बंधू अमोल यांच्या लग्नाचा स्वागत सोहळा घोडबंदर रोड येथील सुरज वॉटर पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. या लग्नसोहळ्यात गुरुवारी (ता. 19) सायंकाळी सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. शिवसेनेचे नेते संजय राऊत, सुभाष देसाई, अरविंद सावंत, अनंत तरे, एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार संजीव नाईक, संजय दिना पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, कॉंग्रेसचे बाळकृष्ण पुर्णेकर, मनोज शिंदे, नारायण पवार आदींनी नवदाम्पत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व नेत्यांमध्ये लग्नात सातत्याने चर्चा सुरू होती ती राज ठाकरे यांच्या आगमनाची. आनंद परांजपे यांनी त्यांची आई सुप्रिया परांजपे व भाऊ अमोल यांच्या आग्रहावरून राज ठाकरे यांना "कृष्णकुंज'वर जाऊन सोमवारी लग्नाची पत्रिका दिली. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना व मनसेमध्ये कटुता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही कटुता आत त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही आली आहे. अशा वातावरणात शिवसेनेच्या खासदारांनी थेट राज ठाकरे यांना लग्नाचे आमंत्रण दिल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता; मात्र दिवगंत खासदार प्रकाश परांजपे यांची विचारपूस शेवटपर्यंत राज ठाकरे यांनी केल्याचे स्मरण परांजपे कुटुंबीयांनी यानिमित्ताने करून दिले. अगदी शेवटच्या काळातही परांजपे यांना भेटून त्यांनी धीर दिला होता. या कौटुंबिक जिव्हाळ्यामुळेच राज यांना लग्नाला बोलाविण्यात आले. राज यांनीही हे नाते जपत शिवसेनेचे खासदार असूनही परांजपे यांच्या बंधूच्या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली. राज ठाकरे यांचे आगमन होताच त्यांना उपस्थितांचा एकच गराडा पडला. लहान-थोर मंडळींनी त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.

नवदाम्पत्याला शुभेच्छा देऊन झाल्यावर पुन्हा एकदा त्यांच्याभोवती गर्दी जमा झाली. या वेळी एकेकाळी भाविसेमध्ये राज यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे व आता ठाणे जिल्ह्याचे उपजिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत असलेले नेते नरेश म्हस्के यांनी राज यांना "ज्यूस' पिण्याचा आग्रह केला; पण पुढील कार्यक्रमांमुळे थोडा वेळ थांबून राज निघून गेले. शिवसेना खासदाराच्या भावाच्या लग्नातील राज यांची उपस्थिती केवळ उपस्थित शेकडो शिवसैनिकच नाही, तर सर्वपक्षीय नेत्यांसाठीही चर्चेचा विषय ठरली होती.

---------------------------------------------
राज-संजय राऊत यांची अखेर गाठ पडली
राज ठाकरे यांच्या आगमनाच्या पंधरा मिनिटे आधी शिवसेनेचे नेते संजय राऊत मंडपात पोचले. ते व्हीव्हीआयपी दालनात भोजन घेत असतानाच राज ठाकरेंचे आगमन झाले. ते वर-वधूंना शुभेच्छा देत असतानाच एलसीडी स्क्रीनवर हा शुभेच्छा सोहळा पाहत संजय राऊतांनी भोजन आटोपते घेतले. व्हीव्हीआयपी दालनात राज ठाकरे काही वेळ थांबण्याची अपेक्षा होती; मात्र ते लगेचच निघाल्याने संजय राऊत व त्यांची गाठ पडलीच. "काय कसे काय? बरे आहे ना?' असे म्हणून दोघेही आपापल्या वाटेने निघून गेले.

पुढच्या वर्षी राज ठाकरेंशी मराठीत बोलेन : आझमी

सकाळ वृत्तसेवा
Friday, November 20, 2009 AT 06:04 AM (IST)


मुंबई - पुढच्या वर्षी दूरचित्रवाणीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर मराठीत चर्चा करण्यासाठी नक्कीच सहभागी होऊ, असा विश्‍वास समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी व्यक्त केला. मनसेच्या आमदारांनी विधानसभेत आझमी यांच्या हिंदीतून शपथ घेण्याला विरोध करीत त्यांना मारहाण केली होती. त्यानंतर या विषयावरून बराच वादविवाद झाला होता.

मराठीचे शिक्षण घेण्यासाठी आझमी यांनी सध्या एका शिक्षकाकडे शिकवणी लावली आहे. रोज सुमारे तासभर ते मराठीचे धडे गिरवित असतात. वर्षभरातील शिकवणीनंतर पुढच्या वर्षी दूरचित्रवाणीवर मी राज ठाकरेंबरोबर मराठीत चर्चा करेन, असे त्यांनी सांगितले.

पाच वर्षांपूर्वीही मी मराठीची शिकवणी लावली होती. मात्र, त्यानंतर मी लोकसभेत निवडून गेल्यामुळे मराठी शिकलो नाही. आता मात्र महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठीतच बोलले पाहिजे, याची मला जाणीव झाली आहे, असे त्यांनी सांगितले

बुधवार, 18 नवंबर 2009

भांडण राजने सुरू केले; मी हिंदीतच बोलणार - आझमी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, November 17, 2009 AT 09:57 PM (IST)

लखनौ - "महाराष्ट्राच्या विधानसभेत मी हिंदीतच बोलणार, कोणाच्या धमकावण्याने घाबरून मी भाषा बदलणार नाही,'' असा इशारा समाजवादी पक्षाचे नेते अबू असीम आझमी यांनी मंगळवारी मनसेला उद्देशून दिला.

विधानसभेत हिंदीतून शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदारांनी केलेल्या धक्काबुक्कीमुळे उत्तर प्रदेशात "हीरो' बनविण्यात आलेले आझमी यांचा पक्षाने सत्कार केला. त्याला उत्तर देताना आझमी यांनी वरील इशारा दिला. पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह आणि राष्ट्रीय सरचिटणीस अमरसिंह यांनी आझमी यांना पक्षाचा मुस्लिम चेहरा म्हणून समोर आणण्याचे स्पष्ट संकेत या निमित्ताने दिले. "राज ठाकरे यांच्या आमदारांना मी तेथेच प्रत्युत्तर देऊ शकलो असतो; मात्र मुलायमसिंह यांची शिकवण आणि संस्कारांनी मला रोखले,'' असेही आझमी म्हणाले.

महाराष्ट्राच्या विधिमंडळात हिंदीतून शपथ घेऊन परतलेले आझमी यांचे येथे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुलायमसिंह यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. "मराठी येत नाही तर काय करू? जगण्यासाठी रोजगार मिळवू, की शाळेत जाऊन शिकू,' असे ते म्हणाले.
दरम्यान, आझमींना महाराष्ट्रात येऊन बोलू तर देत, असे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिले.

"अबू आझमी फक्त पेटवापेटवीचे धंदे करीत आहेत. लखनौमध्ये जाऊन अशा प्रकारची वक्तव्ये करून राजकारण करण्याचा हा प्रकार आहे. त्यांना जे बोलायचे ते येथे येऊन बोलू दे, मग नंतर बघू,' अशी प्रतिक्रिया "मनसे'चे सरचिटणीस व आमदार शिशिर शिंदे यांनी आज येथे दिली.

सारे काही व्होट बॅंकेसाठी - शिंदे
शिंदे यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, "आझमी दोन जागांवर निवडून आले आहेत, त्यांपैकी एक जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे दुसरी जागा निवडून आणण्यासाठी व व्होट बॅंकेच्या राजकारणासाठी ते ही बडबड करीत आहेत. आम्ही त्यांच्या बडबडीला महत्त्व देत नाही.''

"मुलायमसिंह हेच देशातील मुस्लिमांचे खरे मसीहा आहेत,' असे प्रतिपादनही आझमी यांनी लखनौमधील सत्काराला उत्तर देताना केले. आझमी यांनी या वेळी पक्षातून बाहेर पडलेल्या आझम खान यांच्यावरही जोरदार टीका केली.

"मनसे' आमदारांना प्रत्युत्तर न देता महात्मा गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाचा स्वीकार केल्याबद्दल अमरसिंह यांनी या वेळी आझमी यांचे कौतुक केले. या प्रकरणामुळे आझमी जनतेच्या नजरेत "हीरो' बनल्याचे ते म्हणाले, तर राष्ट्रभाषेबद्दल दाखवलेल्या सन्मानाबद्दल आझमी यांचे लखनौसह उत्तर प्रदेशातील इतर पाच शहरांमध्येही भव्य सत्कार करण्याची घोषणा मुलायमसिंह यांनी केली. खासदार जया बच्चन यांची उपस्थिती या वेळी विशेष लक्ष वेधत होती, तर खासदार जयाप्रदा यांची अनुपस्थिती मात्र चर्चेचा विषय ठरली.

अमरसिंह यांचा पक्षावर वाढता प्रभाव; तसेच मुलायमसिंह यांनी भाजप बंडखोर कल्याणसिंह यांच्याशी केलेल्या सलोख्यामुळे दुखावलेले मुस्लिम नेते आझम खान पक्षातून बाहेर पडले होते. बाबरी मशीद विध्वंसाला कल्याणसिंहच कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या पार्श्‍वभूमीवर आझमी यांना पक्षाचा मुस्लिम चेहरा म्हणून पुढे आणण्याचा पक्षाचा विचार आहे. त्यातच हिंदीतून शपथ घेण्याच्या प्रकरणावरून "मनसे'ने केलेल्या गदारोळामुळे आझमी यांचे पक्षातील वजन आणखी वाढल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्यांना पक्षात विशेष स्थान मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
Free Counter
Free Counter


मंगलवार, 17 नवंबर 2009

आझमीला येथे येऊन बोलू दे.... - शिशिर शिंदे

आझमीला येथे येऊन बोलू दे.... - शिशिर शिंदे
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, November 17, 2009 AT 11:45 PM (IST)

मुंबई - अबू आझमी फक्त पेटवापेटवीचे धंदे करीत आहेत. लखनौमध्ये जाऊन अशा प्रकारची वक्तव्ये करून राजकारण करण्याचा हा प्रकार आहे. त्यांना जे बोलायचे ते येथे येऊन बोलू दे, मग नंतर बघू, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व आमदार शिशिर शिंदे यांनी आज येथे दिली.

महाराष्ट्राच्या विधानसभेत हिंदी भाषा आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची आव्हानात्मक भाषा आझमी यांनी लखनौमध्ये केली. यासंदर्भात आमदार शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आझमी दोन जागेवर निवडून आले आहेत, त्यापैकी एक जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे दुसरी जागा निवडून आणण्यासाठी व व्होट बॅंकेच्या राजकारणासाठी ते ही बडबड करीत आहेत. आम्ही त्यांच्या बडबडीला महत्त्व देत नाही.

रविवार, 15 नवंबर 2009

'कोहिनूर'ची जमीन राज ठाकरेंनी विकली

'कोहिनूर'ची जमीन राज ठाकरेंनी विकली
सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 15, 2009 AT 02:27 PM (IST)

मुंबई - घसघशीत ४२१ कोटी रुपये मोजून खरेदी करण्यात आलेली दादर येथील "कोहिनूर' मिलची जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पार्टनरनी विकली आहे. आर्थिक मंदीमुळे ही जमीन विकत असल्याचे कारण राज यांच्या "मातोश्री इन्फ्रास्ट्रक्‍चर'ने सांगितले आहे. तरीही मंदीच्या काळात या जागेला ६२९ कोटी रुपये इतका भाव आला आहे. जमिनीच्या व्यवहारात संबंधितांचे उखळ पांढरे झाले असले, तरी या जागेवर उभ्या राहणाऱ्या मॉलमध्ये रोजगार मिळण्याचे मराठी तरुणांचे स्वप्न तूर्तास तरी भंगले आहे. येत्या काळात या जागेवर व्यावसायिक संकुल उभे राहणार असून त्यामध्ये तरी मराठी तरुणांना रोजगार मिळेल काय, असा सवाल आता केला जात आहे.

राज ठाकरे हे "मातोश्री इन्फ्रास्ट्रक्‍चर'चे संचालक असून त्यांचे व्यावसायिक भागीदार राजन शिरोडकर हे या कंपनीचे चेअरमन आहेत. "मातोश्री इन्फ्रास्ट्रक्‍चर'ने २००५ मध्ये कोहिनूर मिलची दादर येथील जागा खरेदी केली होती. या व्यवहारात शिवसेना नेते मनोहर जोशी यांचा "कोहिनूर ग्रुप' आणि "इन्फ्रास्ट्रक्‍चर लीजिंग ऍण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस' ही कंपनी राज यांचे भागीदार होते. शिवसेना भवनसमोरच असलेली कोहिनूर मिल क्रमांक तीनची ही सुमारे पाच एकर जागा तेव्हा ४२१ कोटींना विकत घेण्यात आली होती. एकापाठोपाठ एक गिरण्या बंद पडत असताना धनदांडगे या जागा विकत घेऊन गिरणी कामगारांना रस्त्यावर आणत असल्याची टीका सुरू असतानाच्या काळात या जागेचे व्यवहार झाले होते.

राज ठाकरे हे तेव्हा शिवसेनेत होते. या जागेसाठी राज यांच्याकडे इतके पैसे आले कुठून, असा सवाल केला जात होता. त्या वेळी राज व त्यांच्या पार्टनरनी बॅंकेतून कर्ज काढल्याचा दाखला दिला होता. दस्तुरखुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्या वेळी राज यांच्या उद्यमशीलतेचे कौतुक करून पाठराखण केली होती. राज यांनीही तेव्हा या जमिनीवर उभ्या राहणाऱ्या उद्योगांत मराठी तरुणांनाच प्राधान्य मिळेल असे वक्तव्य केले होते.

शिवाजी पार्कसारख्या ठिकाणी मोक्‍याच्या जागेवर असलेल्या या जमिनीवर "मातोश्री इन्फ्रास्ट्रक्‍चर' कंपनी मॉल बांधणार होती. त्यादृष्टीने मॉलच्या तळघराचे बांधकाम पूर्ण झाले होते; मात्र आर्थिक मंदीमुळे मॉलमधील दुकानांना मिळणारा ६०० रुपये प्रति चौरस फुटांचा भाव २०० रुपयांपर्यंत खाली उतरला. मंदीत होणाऱ्या या आर्थिक नुकसानीमुळे कंपनीने ही जागा तेथील बांधकामासह सहा महिन्यांपूर्वी विकल्याचे "मातोश्री इन्फ्रास्ट्रक्‍चर'चे राजन शिरोडकर यांनी सांगितले.

चार वर्षांपूर्वी ४२१ कोटी रुपयांना खरेदी केलेल्या या जमिनीची किंमत बाजारभावाप्रमाणे १०५० कोटींवर पोचते; मात्र मंदीमुळे ६२९ कोटी रुपयांना ती विकण्यात आली आहे. जमीनविक्रीनंतर तिन्ही पार्टनरना प्रत्येकी ६२ कोटी रुपयांचा लाभ झाल्याचे राजन शिरोडकर यांनी सांगितले. आर्थिक मंदीमुळे जमिनीला ६२९ कोटी रुपये भाव आल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात हा व्यवहार त्यापेक्षाही जास्त रकमेने झाला असावा, अशी शक्‍यता रिअल मार्केटमध्ये व्यक्त केली जात आहे.

स्टेट बॅंक मुद्द्यावरून सेना-मनसे आमने-सामने?

स्टेट बॅंक मुद्द्यावरून सेना-मनसे आमने-सामने?
सकाळ वृत्तसेवा
Saturday, November 14, 2009 AT 11:53 PM (IST)


मुंबई - स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या पदांवर मराठी भाषक तरुणांनाच नोकरी देण्यात यावी, परप्रांतीयांची निवड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला होता. 'मनसे' विरोधात आता शिवसेना उतरली असून मनसेनं गोंधळ घातल्यास शिवसेना दादर, बांद्रा, पार्ल्यात सुरक्षा देणार आहे.

आज (रविवार) होणाऱ्या बॅंकेच्या भरती परीक्षेसाठी परप्रांतीय उमेदवारही येणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक पोलिस ठाण्याला दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच परीक्षा केंद्रांवर पोलिस तैनात करण्यात येणार असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस ठाण्यांना अतिरिक्त कुमकही पुरविण्यात आली आहे.