शुक्रवार, 19 जून 2015

बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांसाठीच मेट्रो : राज ठाकरे

मुंबई : मुंबईला मेट्रोची गरज नाही. बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांसाठीच हा प्रकल्प राबवला जात आहे. अशा मेट्रोसाठी दादरकरांच्या घरांना हात लावू देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रस्तावित दादर स्थानकासाठी दादरमधील काही इमारतींना मुंबई मेट्रो रेल महामंडळाने नोटिसा पाठवल्याने रहिवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत दादरमधील रहिवाशांच्या शिष्टमंडळाने आज सकाळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या मुद्द्यावर नागरिकांच्या पाठीशी असल्याचे आश्‍वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप-शिवसेना युती सरकारवर जोरदार टीका केली.
मेट्रो प्रकल्पाच्या निमित्ताने मुंबई वेगळी करण्याचा डाव आहे. बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांसाठी मेट्रो आणली जात आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे प्रकल्प पुढे न्यायचे असतील, तर तुम्ही सत्तेत कशाला? शिवसेना सत्तेत की विरोधात, हेच कळत नाही. राज्य सरकारने पुनर्वसनाची हमी दिली असली तरी पुनर्वसन या शब्दावर माझा विश्‍वास नाही. मेट्रोसाठी दादरमधील एकाही घराला हात लावू देणार नाही, असे ते म्हणाले.

शिवसेनेचे शिष्टमंडळही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
दादरमधील प्रकल्पबाधितांना सोबतीला घेऊन शिवसेनेच्या शिष्टमंडळानेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेतली. या शिष्टमंडळात मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर यांचा समावेश होता. एकही कुटुंब विस्थापित होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिल्याचे सांगण्यात आले.