- सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, January 31, 2013 AT 03:30 AM (IST)
शिवसेनेशी पुन्हा संबंध प्रस्थापित करायचे असतील, तर राज यांनी तसा निर्णय घ्यावा, असे आवाहन उद्धव यांनी केले असतानाच मुंडे यांनी पुन्हा एकदा एकीकरणाची हाक दिली आहे. महाराष्ट्रात सत्तेत परतायचे असेल, तर भाजप-सेना युतीत तिसरा भिडू हवा, असे विधान गोपीनाथ मुंडे यांनी यापूर्वी केले होते. आज पुन्हा एकदा त्यांनी या विधानाचा पुनरुच्चार केला.
उद्धव आणि राज यांच्या वादात भाजपने मध्यस्थाची भूमिका बजावावी, असे मुंडे यांचे प्रारंभापासून प्रयत्न होते. आज एका हाताने टाळी वाजेल कशी, असा प्रश्न उद्धव यांनी करताच भाजपनेते पुन्हा एकदा कामाला लागले. राज या प्रयत्नांना प्रतिसाद देतात काय, याकडे भाजपचे लक्ष लागले आहे.
बाळासाहेबांचे आजारपण आणि उद्धव यांच्यावर करावे लागलेले उपचार या दरम्यान दोन्ही भाऊ एकमेकांशी बोलू लागले हीदेखील एखाद्या मोठ्या प्रक्रियेची सुरवात असू शकते, असे मत भाजपत व्यक्त केले जाते आहे. राज यांच्याशी माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचे जवळचे संबंध आहेत. आज दोन्ही भावांनी एकत्र येणे अशक्य वाटत असले, तरी भाजप यासंदर्भात पावले उचलू शकेल, असा विश्वास या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना विशेषत: मुंडे यांना आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें