शनिवार, 11 जून 2011

वाढदिवस साजरा करणार नाही - राज ठाकरे

वाढदिवस साजरा करणार नाही - राज ठाकरे
-
Saturday, June 11, 2011 AT 05:43 PM (IST)
पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खडकवासला मतदारसंघाचे आमदार रमेश हिरामण वांजळे यांच्या निधनाने मला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे १४ जून रोजी असलेला माझा वाढदिवस कार्यकर्त्यांनी साजरा करू नये, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) केले.

राज ठाकरे म्हणाले, ""वांजळे यांच्या मृत्यूपूर्वी मी १० मिनिटे त्यांच्याशी बोललो होतो, त्यांचा आवाज अजूनही माझ्या कानात घुमतोय. त्यांच्या निधनाने मला मोठा धक्का बसला आहे. वांजळे यांच्यावर नागरिकांचे अतोनात प्रेम आहे. त्यांच्यावर टाकलेली कामगिरी ते चोखपणे पार पाडत. म्हणूनच आज वैकुंठमध्ये झालेली गर्दी ही त्यांच्या स्वभावाची आणि जनसंपर्काची निदर्शक होती. येत्या १४ जून रोजी माझा वाढदिवस आहे. मी हा वाढदिवस साजरा करणार नाही. मी मनसेच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी कोणत्याही प्रकारे माझा वाढदिवस साजरा करू नये.''

दरम्यान, आज (शनिवार) दुपारी वैकुंठ स्मशानभूमीवर वांजळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता.

सोमवार, 30 मई 2011

दादरच्या नामांतराला राज ठाकरेंचा ठाम विरोध

दादरच्या नामांतराला राज ठाकरेंचा ठाम विरोध
-
Tuesday, May 31, 2011 AT 03:00 AM (IST)
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव एका रेल्वे स्थानकाला देण्याचा आग्रह धरून त्यांचे व्यक्तिमत्त्व लहान करू नका असे बजावतानाच, बाबासाहेबांच्या महान व्यक्तिमत्त्वाचा आदर करण्यासाठी पाचशे रुपयांच्या नोटांवर त्यांचे छायाचित्र छापावे, त्यासाठी सर्व पक्षांच्या खासदारांनी आग्रह धरावा, अशी सूचना करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला गुगली टाकली. दादर स्थानकाचे चैत्यभूमी असे नामकरण करण्यास आपला ठाम विरोध असल्याचेही राज ठाकरे यांनी जाहीर केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आदर आणि प्रेम असेल, तर त्यांनी राज्यातील सर्व खासदारांना एकत्र करून केंद्र सरकारवर दबाव आणावा. डॉ. बाबासाहेबांचे छायाचित्र नोटांवर छापा, असा आग्रह लोकसभेत धरावा, असे राज यांनी स्पष्ट केले. "कृष्णकुंज' या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राजकारणासाठी महात्म्यांच्या नावाचा वापर करू नका. नामांतराने मूळ सामाजिक, आर्थिक समस्या सुटणार नाहीत. आपल्याच लोकांनी ठेवलेली नावे काढून नवीन नावे देण्यास माझा ठाम विरोध असेल असे ठणकावून ते म्हणाले, की माझा विरोध व्यक्‍तीला नाही; तर महापुरुषांच्या नावाचा राजकारणासाठी वापर करण्याच्या प्रवृत्तीला आहे. जुनी नावे काढून नवीन नामकरण करण्यात संपूर्ण राजकारण दडलेले असते आणि असे राजकारण समाजाच्या उन्नतीसाठी हानीकारक असते.

नामांतराने मूळ समस्या सुटत नाहीत, असे स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले, की आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिल्यानंतर तिथल्या सुविधा बदलल्या का? मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेबांचे नाव दिल्यानंतर त्या विद्यापीठाच्या शिक्षण पद्धतीत बदल झाला का? केवळ नामांतराचे राजकारण करण्याच्या या प्रकारामुळे गरीब आणि गरजू बांधवांच्या समस्या सुटत नाहीत. म्हणून नामांतर करण्यास आपला ठाम विरोध आहे.

महान लोकांची नावे लहान वास्तू, रस्ते यांना देण्यास माझा कायम विरोध आहे. मग माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय कोणी घेतला तरी त्याचा मी विरोधच करीन, असेही राज ठाकरे या वेळी म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव एका रस्त्याला दिल्यानंतर पुन्हा वांद्रे-वरळी सागरी सेतूला त्यांचे नाव कशाला हवे? महाराष्ट्रात अनेक थोर पुरुष होऊन गेले, त्यांची नावे का दिली जात नाहीत? केवळ चारपाच नावांच्या पलीकडे जायचेच नाही, ही पद्धतच चुकीची आहे, असा टोला त्यांनी लगावला

शुक्रवार, 15 अप्रैल 2011

"खळ्‌ळऽऽ खटाक" हा "राज' मार्ग नाही...

"खळ्‌ळऽऽ खटाक" हा "राज' मार्ग नाही...
मृणालिनी नानिवडेकर (सकाळ न्यूज नेटवर्क)
Saturday, April 16, 2011 AT 12:00 AM (IST)
 

सामान्य मराठी मुंबईकराचा पिंड गेली तीन-चार दशके शिवसेनेच्या आक्रमक धोरणांवर पोसला गेला. तो झणझणीतपणा अळणी झाल्याने अस्वस्थ झालेले शिवसेनेचे सहानुभूतीदार राज यांच्यावर नजरा लावून बसलेले असतात. भय्यांवर आक्रमण करून राज यांनी अचूक नेम साधला आहे.
उपऱ्यांच्या आगळिकींना लक्ष्य करण्याचा अजेंडा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा हाती घेतला आहे. शिवांबूच्या स्वादाने पाणीपुरी रसाळ करणाऱ्या भय्याची किळसवाणी कहाणी समोर येताच मनसेने खळ्‌ळऽऽ खटाकची जुनी भाषा नव्याने अंगीकारली असून मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकांत भूमिपुत्रविरुद्ध उपरे याच अस्त्राचा पुन्हा एकवार वापर करण्याचा पक्षाचा विचार दिसतो. ठाण्यातला एक पाणीपुरीवाला भय्या हिडीस वाटणारा प्रकार करीत पदार्थ विकत असल्याची फिल्म वाहिन्यांवर झळकताच राज ठाकरेंनी या विषयातला मोठा आशय हुडकून पक्षयंत्रणेला कामाला लागण्याचे आदेश दिले. भेळपुरीवाल्या भय्यांच्या गाड्या लगेचच मनसैनिकांचे लक्ष्य ठरल्या. आमच्या प्रांतात येऊन धंदा करताना आगळिकी कराल तर खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दम भरला गेला. आदेशाची वाट पाहणारे राडेबाज नेतृत्व कामाला लागले. आंदोलनाला प्रसिद्धी मिळाली, गाड्या फुटल्या, अटका झाल्या. भय्ये घाबरले असे मराठी माणसाला वाटले. एका घटनेने हे सारे काही साध्य केले.

सामान्य मराठी मुंबईकराची नाडी ओळखण्याचे राज ठाकरे यांचे कसब तसेही वादातीत. प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि ओघवते वक्‍तृत्व यांची देणगी लाभलेले राज लोकांना काय भावते ते बिनचूक ओळखू शकतात. ठाण्यात एका कॉलेजातल्या मुलीने पाणीपुरीवाल्या भय्याची आगळीक मोबाईल कॅमेरात टिपून प्रसिद्धिमाध्यमांकडे पाठवली. मात्र, मनसेचे दूत तिच्या घरी पोचले. तिचे नाव अंकिता राणे. राजसाहेबांनी तिच्या स्मार्ट कृत्याचे कौतुक करताच कार्यकर्त्यांना योग्य तो संदेश मिळाला. पाणीपुरी-भेळपुरीवाल्या भय्यांच्या गाड्यांचे खळ्‌ळ। खटाक सुरू झाले. पूर्वी अस्वच्छ पाणीपुरीसमोर पर्याय उभा करण्यासाठी मनसेने मराठी माणसांनी तयार केलेल्या पाणीपुरीविक्रीला प्रोत्साहन दिले होते. मुंबईत चौपाट्या खूप आणि पाणीपुरी तयार करणारी मराठी माणसे कमी असल्याने हे प्रतिकात्मक आंदोलन अर्ध्यावरच संपले. अंकिताने मात्र सोय करून दिली. पिटात बसून सिनेमा बघण्याचा आनंद घेणारे आणि अप्राप्य ड्रेससर्कलला नावे ठेवत बाल्कनीची मजा लुटणारे दोन्ही वर्ग राज ठाकरे यांचे समर्थक. गलिच्छ खाद्यपदार्थांसारखा विषय दोघांनाही एक करणारा. सामान्य मराठी मुंबईकराचा पिंड गेली तीन-चार दशके शिवसेनेच्या आक्रमक धोरणांवर पोसला गेला. कार्याध्यक्षांनी तो झणझणीतपणा अळणी केल्याने अस्वस्थ झालेले शिवसेनेचे सहानुभूतीदार राज यांच्यावर नजरा लावून बसलेले असतात. त्यांना असे काही घडले, की जुन्या नवलाईचा आठव होतो. दुसरीकडे मतदानासाठी बाहेर न पडणाऱ्या मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय मराठी अभिजनही उपऱ्यांमुळे संस्कृती लयाला नेली असे मानतो. कायदा हातात घेणे अनुचित असले, तरी हे बाहेरचे लोक "कानाखाली आवाजा'चीच भाषा जाणतात या श्रद्धेमुळे राडे त्यांना "नेसेसरी इव्हिल' वाटतात. अस्मितेच्या राजकारणाशी संबंध नसलेले मुंबई महापालिकेचे आयुक्‍तही परप्रांतीयांमुळे मुंबईतील मलेरियाची साथ आटोक्‍यात येऊ शकत नाही, असे विधान करतात तेव्हा हा उच्चभ्रू वर्ग खूष होतो. राज यांनी चुणूक दाखवत या दोन्ही वर्गांना खूष करून टाकले. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत राज-उद्धव यांचे शक्तिप्रदर्शन बरोबरीत सुटले. मुंबई-ठाण्यात मजबूत संघटनात्मक बांधणी असलेल्या जुन्या शिवसेनेला नवा पर्याय पुरून उरणार काय याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. मुंबई पालिका जिंकण्याची ईर्ष्या कॉंग्रेसनेही बाळगली आहे. ती लक्षात घेता; भगव्यात मोडणाऱ्या पक्षांनी या निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाण्याचे आवाहन भाजपने केले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वातील कॉंग्रेस पूर्वसुरींप्रमाणे शिवसेनेला रोखण्यासाठी मनसेला रसद पुरवेल का याबद्दल शंका घेतली जाते. बाळासाहेबांच्या नावे मराठी मतांना एक आणण्याचे प्रयत्न शिवसेना करणार हे उघड असल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांना थोपवणे ही मनसेची अग्निपरीक्षा आहे.

अर्थात राजकारण बाजूला ठेवले तरी या समस्येला कित्येक पैलू आहेत. गावात रोजगार न मिळालेली कित्येक डोकी वळकटी बांधून मुंबई गाठतात. आपला मुलूख सोडून कुणीही खुषीने परप्रांत जवळ करत नाही हे राज यांनी लक्षात घ्यायला हवे. संकुचित वृत्तींचे सध्या फोफावले आहे. मुंबईत होणारी गर्दी ही केवळ मराठी माणसाची नव्हे; तर संपूर्ण भारताची शोकांतिका आहे या भावनेतून विचार करणे ठाकरेंना आवडणार नाही. विक्रेते अस्वच्छ वातावरणात रांधलेले खाद्यपदार्थ मुंबईकरांना विकतात. कित्येक तास घराबाहेर असलेल्या मुंबईकरांना खिशाला परवडतील असे पदार्थ खाऊन उदरभरण करावे लागते. या विक्रेत्यांवर कोणतेही नियंत्रण ठेवण्याची सरकारची इच्छा नसते. महापालिकेचे आरोग्य खाते असेल किंवा राज्य सरकारचे पोलिस खाते प्रारंभी विक्रेत्यांवर रुबाब करतात आणि नंतर चिरीमिरी घेऊन मूग गिळतात. अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्याचे काम यंत्रणा करत नसल्याने राडा संस्कृती फोफावते. हा दिलासा क्षणकालाचा आहे. आंदोलन शांत होताच पुन्हा गैरव्यवहार सुरू होणार आहेत याची जाणीव विसरून कसे चालणार?

गुरुवार, 14 अप्रैल 2011

मनसेची फेरीवाल्यांना मारहाण

मनसेची फेरीवाल्यांना मारहाण
सकाळ वृत्तसेवा
Friday, April 15, 2011 AT 01:15 AM (IST)
 

मुंबई -  ठाण्यातील एका परप्रांतीय पाणीपुरीवाल्याने केलेल्या गलिच्छ प्रकाराचा फटका आज मुंबईतील अनेक परप्रांतीय पाणीपुरी, भेळपुरी आणि लिंबू सरबतवाल्यांना बसला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज अनेक ठिकाणी सर्वसामान्य मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना चोप देऊन त्यांना पळवून लावले. काही फेरीवाल्यांच्या गाड्याही संतप्त कार्यकर्त्यांनी उलटून टाकल्या. त्यामुळे शहरातील मोक्‍याची ठिकाणे अडवून पाणीपुरी, भेळपुरी व लिंबू सरबत विकणाऱ्या परप्रांतीयांच्या असंख्य गाड्या संध्याकाळपासून दिसेनाशा झाल्या.

ठाण्यात नौपाडा येथील परप्रांतीय पाणीपुरीवाला त्याच्या ठेल्याजवळच लोट्यात लघुशंका करून, त्याच लोट्याचा वापर खवय्यांना पाणी देण्यासाठी करीत असल्याचा किळसवाणा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला. या घटनेचा सर्वच स्तरांतून निषेध होत होता. प्रसिद्धिमाध्यमांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काही दिवसांपूर्वी उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या, तसेच अस्वच्छता ठेवणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंबंधी महापालिकेकडे पत्रव्यवहार केला होता; परंतु त्यावर महापालिकेकडून कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यातच ठाण्यातील प्रकार घडल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते संतापले. त्यांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केले. दादर, कबुतरखाना, गिरगाव, छत्रपती शिवाजी टर्मिनस, खाऊ गल्ली, कुलाबा, गोरेगाव या परिसरात बसणाऱ्या पाणीपुरी, भेळपुरी व लिंबू सरबतवाल्या फेरीवाल्यांना दुपारी साडेतीन वाजल्यापासून त्यांनी व्यवसाय करण्यास मनाई केली. काही फेरीवाल्यांना वारंवार बजावूनही त्यांनी आपल्या गाड्या न हटविल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी या फेरीवाल्यांना बेदम चोप दिला. याशिवाय काही गाड्याही उलटून टाकल्या. या आंदोलनामुळे सायंकाळपर्यंत संपूर्ण शहरातून पाणीपुरी, भेळपुरी व सरबतवाल्या परप्रांतीय फेरीवाल्यांच्या गाड्या गायब झाल्या.
या संदर्भात बोलताना मनसेचे दादर विभागप्रमुख संदीप देशपांडे म्हणाले, ""महापालिकेकडे अनेकदा पत्रव्यवहार केल्यावरही उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या आणि अस्वच्छता निर्माण करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळेच मनसेने आपल्या स्टाईलने आंदोलन केले.'' दरम्यान, अशा कोणत्याही आंदोलनाची पोलिसांकडे नोंद नाही; मात्र कायदा हातात घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलिस प्रवक्ते व पोलिस उपायुक्त राजकुमार व्हटकर यांनी सांगितले.

गुरुवार, 31 मार्च 2011

बेस्टमध्ये मनसेने जागा पटकावली

बेस्टमध्ये मनसेने जागा पटकावली
सकाळ वृत्तसेवा
Thursday, March 31, 2011 AT 12:45 AM (IST)
 
मुंबई - मुंबई महापालिकेत समाजवादी पक्षा (सप)चे आणि मनसेचे प्रत्येकी सात सदस्य असल्याने या दोन्ही पक्षांपैकी बेस्ट समितीवर नियुक्त करायच्या एका सदस्यासाठी मंगळवारी (ता.29) पालिका सभागृहात मतदान घ्यावे लागले. ऐन वेळी समाजवादी पक्षाचा सदस्य गैरहजर राहिल्यामुळे मनसेच्या सदस्याला निवडण्याशिवाय शिवसेनेपुढे पर्याय राहिला नाही. भाजपने समाजवादी पक्षाऐवजी मनसेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली. अखेर मनसेचे प्रकाश पाटणकर यांनी "बेस्ट'मध्ये जागा मिळवलीच.

पालिकेच्या स्थायी, सुधार, शिक्षण आणि बेस्ट समित्यांच्या सदस्यांची मुदत संपल्याने मंगळवारी पालिकेच्या सभागृहात या समित्यांच्या सदस्यांच्या नव्या नियुक्‍त्या जाहीर करण्यात आल्या. पालिकेत सप आणि मनसे यांचे संख्याबळ समान आहे. स्थायी आणि सुधार समितीतील संख्याबळामुळे या दोन्ही पक्षांचा प्रत्येकी एकेक सदस्य आहे; मात्र बेस्टमध्ये त्यांचा सदस्य नसल्याने या समितीच्या सदस्यत्वासाठी दोन्ही पक्षांनी जोरदार प्रयत्न चालविले होते. एखाद्या सदस्याच्या निवडीसाठी राजकीय पक्षांनी गट केल्यामुळे त्याच्यासाठी निवडणूक अपरिहार्य ठरते. त्यामुळे ही निवडणूक घ्यावी लागली.

मनसेने प्रकाश पाटणकर आणि "सप'ने शेख नझीमुल्ला यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. निवडणुकीच्या वेळी साजिया आझमी या गैरहजर होत्या. त्यामुळे सपची सदस्यसंख्या सहा झाली, तर मनसेचे सर्व सातही सदस्य हजर असल्याने पाटणकर यांचा एका मताने विजय झाला.
बेस्टमध्ये मनसेला एन्ट्री मिळू नये यासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न चालविले होते. महापौर श्रद्धा जाधव आणि सभागृहनेते सुनील प्रभू यांनी भाजपचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता; मात्र भाजपने सपला सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेना संकटात सापडली. भाजपने मनसेला मतदान केले, तर शिवसेना सपच्या पाठीशी राहिली. मनसेने या निवडणुकीत बाजी मारल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

नवनियुक्त सदस्यस्थायी समिती - शिवसेना - शुभदा गुडेकर, कॉंग्रेस - सूर्यवंश ठाकूर, रघुनाथ थवई, भाजप - विद्या ठाकूर.
सुधार समिती - भाजप - भालचंद्र शिरसाट, शिवसेना - दिलीप शिंदे, शिवकुमार झा, राष्ट्रवादी कॉंग्रेस - चारू चंदन शर्मा.
शिक्षण समिती - कॉंग्रेस - भोमसिंह राठोड, भाजप - विनोद घेडिया, उज्ज्वला मोडक, राष्ट्रवादी कॉंग्रेस - सारिका ग्रेसेस.
बेस्ट समिती - मनसे - प्रकाश पाटणकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस - शरद शिवकुमार पवार.

सोमवार, 28 मार्च 2011

मनसे'च्या कार्यकर्त्यांची महापालिकेत तोडफोड

मनसे'च्या कार्यकर्त्यांची महापालिकेत तोडफोड
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, March 29, 2011 AT 12:30 AM (IST)
 
नांदेड - नळाद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याचा तक्रारी देऊनही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. 28) दुपारी साडेबाराच्या सुमारास पाणीपुरवठा विभागावर हल्लाबोल करून तोडफोड केली.

शहरातील गणेशनगर भागातील गणेश मंदिर ते प्राथमिक शाळा या रस्त्यावरील घरांमध्ये नळाद्वारे पिण्याच्या पाण्यासोबत ड्रेनेजचे पाणी येत असल्याच्या तक्रारी या भागातील रहिवाशांनी केल्या होत्या. गेल्या आठ दिवसांपासून असे पाणी येत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे होते. या भागातील पाइपलाइन बदलावी, अशी मागणीही करण्यात आली होती; मात्र याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले. अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सांगूनही उडवाउडवीची उत्तरे मिळाली. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनोद पावडे, पप्पू मनसुके, सय्यद फारूख, अच्युत जगताप, दत्ता घुमशेटवार, अनुप आगाशे, अनिल कदम, राजेश अन्नदाते यांच्यासह इतर चाळीस कार्यकर्ते सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास महापालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयात आले. या वेळी सहायक आयुक्त प्रकाश येवले आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यशवंत गच्चे आणि उपअभियंता भागानगरे कुठे आहेत? अशी विचारणा या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे केली. श्री. येवले यांनी गच्चे यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणे करून दिले. त्यावर मनसेचे पदाधिकाऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी ड्रेनेजमिश्रित पाणीही सोबत आणले होते. संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी गच्चे यांच्या खुर्चीला या ड्रेनेजमिश्रित पाण्याने स्नान घातले आणि घोषणाबाजी सुरू केली. काही कार्यकर्त्यांनी कार्यालयातील फाईल, संचिका फेकण्यास सुरवात केली. टेबलवरील काच फोडण्यात आला. खुर्च्या तोडण्यात आल्या. काही खुर्च्यांची फेकाफेक करण्यात आली. टेबलही उचलून फेकण्यात आले. संगणकाचीही मोडतोड करण्यात आली. जोरदार घोषणाबाजी करीत सर्वजण घटनास्थळाहून निघून गेले. या प्रकाराने काही काळ महापालिकेत गोंधळ झाला.

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील देशमुख व इतर पोलिसांनी तेथे धाव घेतली. पाणीपुरवठा विभागात फाईली, संचिका अस्ताव्यस्त पडल्या होत्या. सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. टेबल-खुर्च्या आणि संगणकाची मोडतोड झाली होती. कार्यकारी अभियंता गच्चे यानंतर तेथे आले.

एक लाखाचे नुकसान
"मनसे'च्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यात शासकीय मालमत्तेचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी सहायक आयुक्त येवले यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

राज ठाकरेंच्या सुरक्षा अधिकाऱ्यावर गुन्हा

राज ठाकरेंच्या सुरक्षा अधिकाऱ्यावर गुन्हा
   वृत्तसंस्था
Monday, March 28, 2011 AT 05:36 PM (IST)
 
पणजी - बंदुक दाखवून ट्रक चालकाला धमकाविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पणजीपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या बोरिम गावाजवळ घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस अधिक्षक अरविंद गुनास यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाने पोंडा पोलिस स्टेशनमध्ये या अधिकाऱ्याविरोधात तक्रार दिली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर धमकाविणाऱ्या व्यक्तीबाबत पोलिसांना लगेच माहिती हाती लागली नाही. मात्र, राज ठाकरे यांचा ताफा मडगाव येथून गेल्याचे समजल्यानंतर हे कृत्य राज ठाकरे यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यानेच केल्याचे स्पष्ट झाले. या अधिकाऱ्याने ट्रक चालकाला मारहाण करीत त्याच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत. ट्रक चालकावर हल्ला करणारा अधिकारी महाराष्ट्र पोलिस दलातील असल्याचे समजते