गुरुवार, 9 फ़रवरी 2012

आता जनतेच्या न्यायालयात मागणार न्याय- राज ठाकरे -

आता जनतेच्या न्यायालयात मागणार न्याय- राज ठाकरे
- सकाळ वृत्तसेवा
Friday, February 10, 2012 AT 01:30 AM (IST)
  
नाशिक - सर्वोच्च न्यायालयात कायद्याबाबत न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. त्यामुळे आता निवडणुकीच्या माध्यमातून जनतेच्या न्यायालयात न्याय मागणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी मनसेतर्फे आज राज ठाकरे यांच्या रोड शोद्वारे श्रीगणेशा झाला. श्री. ठाकरे यांनी "रोड शो'दरम्यान मनसेच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांना भेटी देत, मतदारांना आवाहन केले. महात्मानगर, रामवाडी, मेन रोड, पंचवटीसह विविध भागांत जोरदार स्वागत झाले. सकाळी अकरापासून सुरू असलेल्या या "रोड शो'दरम्यान दुपारी ते पत्रकारांशी बोलले.

महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी मुंबई उच्च न्यायालयाने शिवाजी पार्क मैदानास परवानगी नाकारल्याने मनसने उच्च न्यायालयाच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तेथेही निर्णय कायम राहिल्याने नाशिकला "रोड शो'दरम्यान श्री. ठाकरे म्हणाले, की उच्च न्यायालयात नाही तर सर्वोच्च न्यायालयात दाद मिळेल या आशेने सर्वोच्च न्यायालयात परवानगी मागितली होती. निदान तेथे तरी न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. पण सगळीकडून कोंडी सुरू आहे. न्यायालयाच्या निर्णयाबाबत काही म्हणायचे नाही. आता जनतेच्या न्यायालयातच न्याय मागू.

दिवसभराच्या दौऱ्यात श्री. ठाकरे यांनी शहरातील सर्व प्रभागांतील मनसे उमेदवारांच्या कार्यालयाला भेटी दिल्या. रोड शोदरम्यान ठिकठिकाणी जमलेली गर्दी पाहता लोकांना आकर्षित करण्याचा राज करिश्‍मा दिसला. रामवाडी, मेन रोड भागात शिवसेनेच्या नेत्यांच्या कार्यालयासमोर रोड शो सुरू असताना चुरसही होती

मनसेला सभेसाठी शिवाजी पार्कचे दार बंद

मनसेला सभेसाठी शिवाजी पार्कचे दार बंद
- सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, February 10, 2012 AT 01:45 AM (IST)
मुंबई - उच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणाच्या मुद्यावरून मनसेला शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यास मनाई केली आहे. त्याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मनसेने केलेले अपील सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळले. त्यामुळे मनसेसाठी शिवाजी पार्कचे दरवाजे बंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवाजी पार्कवर 13 फेब्रुवारीला जाहीर सभा घेण्यासाठी मनसेने मोर्चेबांधणी करून महापालिकेकडून परवानगी मिळवण्यासाठी 35 अर्ज दाखल केले होते. महापालिका निवडणुकीसाठी शिवाजी पार्क मिळण्याची शक्‍यता कमी असल्याने शिवसेनेने आधीच वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानाची निवड केली होती.

मनसेला शिवाजी पार्कवर सभा घेण्यास नकार देत महापालिकेने त्यासाठी ध्वनिप्रदूषणाबाबतच्या नियमांचा आधार घेतला होता. त्याविरोधात मनसेने उच्च न्यायालयात धाव घेतली; पण तेथेही नकारच मिळाला. त्याबद्दल राज यांनी जाहीरपणे नाराजी प्रकट केली होती. सभा मैदानात घ्यायच्या नाहीत, तर कुठे घ्यायच्या, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला होता. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला एक न्याय; आणि मनसेच्या सभेला दुसरा न्याय लावला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला होता. राज्य सरकारही शिवसेनेला साथ देत असल्याने रस्त्यावरच सभा घेऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात जाहीर सभा घेण्याची शक्‍यता त्यांनी फेटाळली होती.

शिवाजी पार्कवर जाहीर सभेची अनुमती द्यावी, अशी मागणी मनसेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिकेद्वारे केली होती. त्यासाठी आमदार नितीन सरदेसाई यांनी प्रयत्न चालवले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्याने मनसेची पंचाईत झाली आहे.

पर्याय शोधण्याकडे दुर्लक्ष?
राज ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणाबाबत गेले काही दिवस केवळ मनसेतच नाही, तर सर्व पक्षांमध्ये तर्कवितर्क लढवले जात आहेत. कृष्णकुंजनजीक, पोर्तुगीज चर्चसमोर, जांबोरी मैदानात अशा पर्यायांवर चर्चा सुरू आहेत. मात्र, "मी बोलेन तेथे लोक जमा होतील', असा आत्मविश्‍वास राज यांनी व्यक्त केला असून सभेचे स्थळ अद्याप गुलदस्त्यातच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून राहिल्याने शिवाजी पार्कला पर्याय शोधण्याकडे मनसेचे दुर्लक्ष झाले, असे बोलले जात आहे. आता महापालिकेचे मैदान मारण्यासाठी राज ठाकरे कोणत्या मैदानाची निवड करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

सर्वोच्च न्यायालयाने मनसेची याचिका फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाने मनसेची याचिका फेटाळली
- वृत्तसंस्था
Thursday, February 09, 2012 AT 05:51 PM (IST)

नवी दिल्ली - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) शिवाजी पार्कच्या मैदानावर सभा घेण्यासाठी मागितलेली परवानगी सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवार) फेटाळून लावली.

उच्च न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

16 एप्रिल रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात परवानगी मागणारी याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे ठाकरे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याचिका फेटाळून लावताना सर्वोच्च न्यायालय म्हणाले, की ही प्रशासकीय पातळीवर घेतला जात असल्याने न्यायालय याबाबत कोणताही निर्णय देऊ शकत नाही

सुप्रीम कोर्टात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न - राज

सुप्रीम कोर्टात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न - राज
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, February 09, 2012 AT 02:00 AM (IST)

पुणे - ""सभेसाठी शिवाजी पार्कचे मैदान मिळू शकणार नाही, या उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत पाच दिवसानंतरही मिळालेली नाही.
यातून, सर्वोच्च न्यायालयात जाण्यास रोखण्याचा प्रयत्न दिसतो,'' असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
"रोड शो'मुळे आचारसंहितेचा भंग झाल्याच्या प्रश्नावर त्यांनी "निवडणूक आयोगाने 1995 पासून काय "शूटिंग' केले आहे, ते मला पाहायचेय. त्यात, किती जणांना शिक्षा झाली. अन्य कोणी निवडणुकीचे कायदे मोडले नाही का,' असे उत्तर दिले.

पुणे महापालिका निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाकरे यांचा "रोड शो' झाला. त्यानंतर, त्यांनी ही भूमिका मांडली. ते म्हणाले, ""आज गल्ली बोळात रुग्णालये झाली आहेत. प्रत्येक ठिकाणी "सायलेन्स झोन' केला, तर सभा, कार्यक्रम घ्यायचे कोठे? निवडणुकीच्या कालावधीत तरी जाहीर सभांना परवानगी मिळायला हवी. मैदान उपलब्ध करून द्यायचे नाही आणि रस्त्यावर सभा घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणे म्हणजे विचारस्वातंत्र्य व्यक्त करण्यावरच मर्यादा घालण्याचा प्रकार आहे. शिवाजी पार्क संदर्भात न्यायालयाने दिलेला निर्णय पटण्यासारखा नाही. कायद्याचा आणि या निर्णयाचा संबंध नाही. तसेच, राज्य सरकारने या संदर्भात न्यायालयात मांडलेली बाजू दुजाभाव करणारी आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर अद्यापही सही झालेली नाही. याबाबत काय बोलायचे?''

कोणाला परप्रांतीयांच्या मागे जायचे असेल तर त्यांनी जावे, मी मात्र मराठी माणसाच्या मागेच जाणार, असे ठाकरे यांनी एका प्रश्‍नाला उत्तर दिले. ते म्हणाले, ""महाराष्ट्रातील शहरातील मराठीचा टक्का कमी करण्याचे षड्‌यंत्र सुरू आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकीसाठी सध्या मुंबईतून रेल्वे भर भरून जात आहेत. ही लोक तिकडे जाऊन मतदान करणार आणि पुन्हा इकडे येऊन मतदान करणार आहेत. त्यांच्यावर कोणतेच बंधन नाही.''

माझे थोबाड पुरेसे आहे
पुण्यातील प्रचारासाठी माझे थोबाड पुरेसे आहे, असे राज ठाकरे यांनी एका प्रश्नावर सांगितले. "पुण्यात एकहाती सत्ता द्या,' या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मागणीवर त्यांनी "राज्य सरकारमध्ये असताना विकासकामे करण्यासाठी त्यांना बहुमताची गरज काय,' असा सवाल केला. मुंबई, ठाणे, नाशिक व पुणे या शहरांचे काही मूळ प्रश्न आहेत. त्यात, मी हात घालणार आहे, असे ते म्हणाले.

रविवार, 5 फ़रवरी 2012

सेनेने फक्त ओरबाडण्याचा कार्यक्रम केला -राज ठाकरे

सेनेने फक्त ओरबाडण्याचा कार्यक्रम केला -राज ठाकरे
संजीव साबडे ः सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, February 06, 2012 AT 02:45 AM (IST)

मुंबई - शिवसेनेने मुंबईची अवस्था कशी करून टाकलीय हे सर्वच जण बघत आहेत. या मंडळींनी शहराला काहीच दिले नाही; मात्र ओरबाडले भरपूर. त्यांच्याकडे प्रचंड कल्पनादारिद्य्र आहे. आता बघा येणाऱ्या निवडणुकीत मनसेची सत्ता या शहरात येईल आणि कायापालट करून दाखवू आम्ही, अशा शब्दांत शिवसेनेचा समाचार घेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत आपणच विजयी होणार, असा विश्‍वास व्यक्त केला. "सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्‍नांना त्यांनी ठाकरी शैलीत उत्तरे दिली.


----------------------------------------------------------------
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, दै. सकाळने विविध राजकीय पक्षांतील नेत्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. या मुलाखतींमध्ये नेत्यांनी आपले परखड विचार व्यक्त केले आहेत. या मुलाखती ई सकाळ विशेष या सेक्शनमध्ये सलगपणे कधीही वाचता येतील.
----------------------------------------------------------------

प्रश्‍न : चार महापालिकांमध्ये सत्ता येईल, असे तुम्ही कशाच्या आधारे सांगता?
राज : मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या चार महापालिकांवर आम्ही सुरवातीपासूनच लक्ष केंद्रित केले होते. गेल्या वेळीही तिथे आमचे नगरसेवक होते. पाच वर्षांच्या काळात त्या-त्या ठिकाणच्या सत्ताधाऱ्यांनी घातलेला गोंधळ मतदारांनी पाहिला आहे. शिवसेना, भाजप, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी त्या महापालिकांमध्ये काय केले, त्या शहरांची कशी वाट लावली, हेही मतदारांना माहीत आहे. मुळात जनतेचा मनसेवर निश्‍चित विश्‍वास
आहे. आम्ही सत्तेत आल्यावर शहरांना नवा आकार देऊ, शहरांमध्ये चांगले रस्ते, चांगली इस्पितळे, बागा, मैदाने, बस वाहतूक देणे यावर आम्ही भर देऊ. चारही महापालिकांत सत्ता मिळेल, असा माझा दावा आहे. चारही शहरांत सध्या बजबजपुरी माजली आहे. ती मनसेच दूर करू शकतो.

प्रश्‍न : तुमच्या पक्षाला मुंबईत किती जागा मिळतील?
राज : आम्ही सत्तेवरच येणार. त्यामुळे सत्ता मिळविण्यासाठी लागणाऱ्या जागा आम्हालाच मिळणार.

प्रश्‍न ः गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे? ती तुम्ही कशी मोडून काढणार?
राज ः अहो, त्यांनी गेल्या पंधरा वर्षांत शहराची बजबजपुरी केली आहे. रस्त्यांवर खड्डे, पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही, आरोग्य व्यवस्था कोलमडलेली, पुरेशी स्वच्छतागृहे नाहीत. यामुळे लोक कंटाळले आहेत. ते पर्यटकांना काय दाखवतात? राणीची बाग, गेट वे ऑफ इंडिया, मस्त्यालय आणि समुद्र. मुंबई वसलेलीच आहे आणि बाकी साऱ्या वास्तू ब्रिटिशकालीन आहेत. युतीने गेल्या पंधरा वर्षांत कोणती नवी वास्तू उभारली, ते सांगा. त्यांनी शहर ओरबाडून खाल्ले. करून दाखवले, करून दाखवले, अशा जाहिराती कसल्या करता?

प्रश्‍न : निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरचे मनसे अध्यक्ष व बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
राज : मला तेथील नेमकी माहिती नाही. पक्षात नाराजी असते. सर्वांना उमेदवारी देणे कोणालाच शक्‍य नसते. पण बंडखोरी असता कामा नये. तसे कोणी करीत असेल, तर मला त्यांची पर्वा नाही. त्यांनी खुशाल बाहेर जावे. निवडणुकीच्या तोंडावरच कशी नाराजी येते? पदे मिळाली तेही नाराज आणि न मिळाली, तेही नाराज? अर्थात या सर्वांतून मलाही कोण सच्चा, कोण कसा ते कळते आहे. बंडखोरी खपवून घेणार नाही.

प्रश्‍न : निवडणुका जाहीर झाल्यानंतर तुम्ही निवडणूक आयोग आणि आता मुंबई उच्च न्यायालयावरही टीका केली?
राज : अखेर निवडणूक आयोगाला एकाच दिवशी मतमोजणीचा निर्णय घ्यावाच लागला ना? खरे तर तो सुरवातीलाच घेतला असता, तर मला बोलायची वेळच आली नसती. हायकोर्टाने आम्हाला शिवाजी पार्कवर सभा घ्यायला परवानगी नाकारली. मग शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी कशी मिळते? ती मिळावी, म्हणून आर. आर. पाटील आणि नोकरशाही का धावपळ करते?

प्रश्‍न : पण तो सांस्कृतिक कार्यक्रम असतो?
राज : ते काय मेळाव्यात सांस्कृतिक भाषणे करतात? त्या वेळी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केले तरी चालते? शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला म्हणे परंपरा आहे. अहो, पण शिवाजी पार्कलाही जाहीर सभांची परंपरा आहेच की. ती कशी विसरून चालेल? मुळात ते सार्वजनिक मैदान आहे की मनोरंजन उद्यान आहे, याचाच निर्णय हाय कोर्टाने दिलेला नाही. सायलेन्स झोन आहे, असे सांगतात. पण गल्लीऐवजी मैदानात फटाके उडवायला का संमती मिळते. जाणता राजा हा कार्यक्रमही तिथे झाला. सायलेन्स झोनमध्ये हे सारे कसे होऊ शकते? या साऱ्यांची उत्तरे न देता केवळ मनसेला स्वतःची ताकद दाखवता येऊ नये, म्हणून बंदी घालता की काय? तिथे राष्ट्रवादी वा कॉंग्रेस सभा घेऊ शकतच नाहीत. एक मी घेऊ शकतो आणि शिवसेना घेऊ शकते. अर्थात आमची सभा तिथे झाली नाही तर रस्त्यावरच होईल. मग लाखो लोकांना करा अटक हिंमत असेल तर.

प्रश्‍न : पण तुम्ही किती सभा घेणार आणि कुठे घेणार?
राज : माझे उद्यापासून रोड शो आहेत. चारही महापालिकांच्या शहरांत. नंतर 10 फेब्रुवारीला ठाणे, 11 ला पुणे,
12 तारखेला नाशिक आणि 13 फेब्रुवारीला मुंबईत सभा घेणार आहे. वेळही फार कमी आहे आणि मुंबईतील अन्य नेत्यांवर उमेदवार निवडून आणण्यासाठीची जबाबदारी टाकली आहे.

प्रश्‍न : उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे नेते आहेत आणि तुमचे चुलत बंधूही?
राज : एक मिनीट...! जो स्वत:च्या जिवावर, शब्दांवर लोकांना निवडून आणू शकतो, तोच खरा नेता. यांना तर आताही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच सभा घ्याव्या लागतात. लोक निवडून येतात, ते बाळासाहेबांमुळे. ते महाराष्ट्राचे नेते आहेत. ते आणि शरद पवार. पण शरद पवारही निवडून आलेल्यांची मोळी बांधून त्याची दोरी स्वतःच्या हातात ठेवतात. सतत इतर पक्षांतील लोकांना फोडणे हा राष्ट्रवादीचा जणू कार्यक्रमच आहे. लोक फोडून पक्षाची ताकद वाढत नसते.

प्रश्‍न : पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी काय सांगाल?
राज : पृथ्वीराज चव्हाण सज्जन आहेत. पण त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही. वरून आणून बसवलेले ते नेते. कामे होतच नाही त्यामुळे. अजित पवार यांना खळखळून किंवा नुसते हसतानाचा एकही फोटो मी पाहिलेला नाही. एककल्ली आहेत ते. त्यांच्यात धमक असू शकेल. पण आपल्या पक्षात आपण एकटेच आहोत आणि इतर कोणीच नाही, असे त्यांना वाटते. गोपीनाथ मुंडेंविषयी मी म्हणेन की चक्रव्यूहात असताना प्रत्येकाने स्वतःला "बर्ड आय व्ह्यू'मधून पाहणे गरजेचे असते. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येते. लेझीम खेळताना दोन पाय पुढे, दोन पाय मागे टाकले जातात. त्यांना कोणी मागे येणे म्हणत नाही. कारण मिरवणूक पुढे जात असते.