
मुंबई
- शिवसेनेने मुंबईची अवस्था कशी करून टाकलीय हे सर्वच जण बघत आहेत. या
मंडळींनी शहराला काहीच दिले नाही; मात्र ओरबाडले भरपूर. त्यांच्याकडे
प्रचंड कल्पनादारिद्य्र आहे. आता बघा येणाऱ्या निवडणुकीत मनसेची सत्ता या
शहरात येईल आणि कायापालट करून दाखवू आम्ही, अशा शब्दांत शिवसेनेचा समाचार
घेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत आपणच विजयी होणार, असा
विश्वास व्यक्त केला. "सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांना
त्यांनी ठाकरी शैलीत उत्तरे दिली.
----------------------------------------------------------------
जिल्हा
परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर,
दै. सकाळने विविध राजकीय पक्षांतील नेत्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. या
मुलाखतींमध्ये नेत्यांनी आपले परखड विचार व्यक्त केले आहेत. या मुलाखती ई सकाळ विशेष या सेक्शनमध्ये सलगपणे कधीही वाचता येतील.----------------------------------------------------------------
प्रश्न : चार महापालिकांमध्ये सत्ता येईल, असे तुम्ही कशाच्या आधारे सांगता? राज
: मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या चार महापालिकांवर आम्ही सुरवातीपासूनच
लक्ष केंद्रित केले होते. गेल्या वेळीही तिथे आमचे नगरसेवक होते. पाच
वर्षांच्या काळात त्या-त्या ठिकाणच्या सत्ताधाऱ्यांनी घातलेला गोंधळ
मतदारांनी पाहिला आहे. शिवसेना, भाजप, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस
यांनी त्या महापालिकांमध्ये काय केले, त्या शहरांची कशी वाट लावली, हेही
मतदारांना माहीत आहे. मुळात जनतेचा मनसेवर निश्चित विश्वास
आहे.
आम्ही सत्तेत आल्यावर शहरांना नवा आकार देऊ, शहरांमध्ये चांगले रस्ते,
चांगली इस्पितळे, बागा, मैदाने, बस वाहतूक देणे यावर आम्ही भर देऊ. चारही
महापालिकांत सत्ता मिळेल, असा माझा दावा आहे. चारही शहरांत सध्या बजबजपुरी
माजली आहे. ती मनसेच दूर करू शकतो.
प्रश्न : तुमच्या पक्षाला मुंबईत किती जागा मिळतील? राज : आम्ही सत्तेवरच येणार. त्यामुळे सत्ता मिळविण्यासाठी लागणाऱ्या जागा आम्हालाच मिळणार.
प्रश्न ः गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे? ती तुम्ही कशी मोडून काढणार? राज
ः अहो, त्यांनी गेल्या पंधरा वर्षांत शहराची बजबजपुरी केली आहे.
रस्त्यांवर खड्डे, पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही, आरोग्य व्यवस्था
कोलमडलेली, पुरेशी स्वच्छतागृहे नाहीत. यामुळे लोक कंटाळले आहेत. ते
पर्यटकांना काय दाखवतात? राणीची बाग, गेट वे ऑफ इंडिया, मस्त्यालय आणि
समुद्र. मुंबई वसलेलीच आहे आणि बाकी साऱ्या वास्तू ब्रिटिशकालीन आहेत.
युतीने गेल्या पंधरा वर्षांत कोणती नवी वास्तू उभारली, ते सांगा. त्यांनी
शहर ओरबाडून खाल्ले. करून दाखवले, करून दाखवले, अशा जाहिराती कसल्या करता?
प्रश्न : निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरचे मनसे अध्यक्ष व बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. राज
: मला तेथील नेमकी माहिती नाही. पक्षात नाराजी असते. सर्वांना उमेदवारी
देणे कोणालाच शक्य नसते. पण बंडखोरी असता कामा नये. तसे कोणी करीत असेल,
तर मला त्यांची पर्वा नाही. त्यांनी खुशाल बाहेर जावे. निवडणुकीच्या
तोंडावरच कशी नाराजी येते? पदे मिळाली तेही नाराज आणि न मिळाली, तेही
नाराज? अर्थात या सर्वांतून मलाही कोण सच्चा, कोण कसा ते कळते आहे. बंडखोरी
खपवून घेणार नाही.
प्रश्न : निवडणुका जाहीर झाल्यानंतर तुम्ही निवडणूक आयोग आणि आता मुंबई उच्च न्यायालयावरही टीका केली? राज
: अखेर निवडणूक आयोगाला एकाच दिवशी मतमोजणीचा निर्णय घ्यावाच लागला ना?
खरे तर तो सुरवातीलाच घेतला असता, तर मला बोलायची वेळच आली नसती.
हायकोर्टाने आम्हाला शिवाजी पार्कवर सभा घ्यायला परवानगी नाकारली. मग
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी कशी मिळते? ती मिळावी, म्हणून आर. आर.
पाटील आणि नोकरशाही का धावपळ करते?
प्रश्न : पण तो सांस्कृतिक कार्यक्रम असतो? राज
: ते काय मेळाव्यात सांस्कृतिक भाषणे करतात? त्या वेळी आवाजाच्या
मर्यादेचे उल्लंघन केले तरी चालते? शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला म्हणे
परंपरा आहे. अहो, पण शिवाजी पार्कलाही जाहीर सभांची परंपरा आहेच की. ती कशी
विसरून चालेल? मुळात ते सार्वजनिक मैदान आहे की मनोरंजन उद्यान आहे, याचाच
निर्णय हाय कोर्टाने दिलेला नाही. सायलेन्स झोन आहे, असे सांगतात. पण
गल्लीऐवजी मैदानात फटाके उडवायला का संमती मिळते. जाणता राजा हा
कार्यक्रमही तिथे झाला. सायलेन्स झोनमध्ये हे सारे कसे होऊ शकते? या
साऱ्यांची उत्तरे न देता केवळ मनसेला स्वतःची ताकद दाखवता येऊ नये, म्हणून
बंदी घालता की काय? तिथे राष्ट्रवादी वा कॉंग्रेस सभा घेऊ शकतच नाहीत. एक
मी घेऊ शकतो आणि शिवसेना घेऊ शकते. अर्थात आमची सभा तिथे झाली नाही तर
रस्त्यावरच होईल. मग लाखो लोकांना करा अटक हिंमत असेल तर.
प्रश्न : पण तुम्ही किती सभा घेणार आणि कुठे घेणार? राज : माझे उद्यापासून रोड शो आहेत. चारही महापालिकांच्या शहरांत. नंतर 10 फेब्रुवारीला ठाणे, 11 ला पुणे,
12
तारखेला नाशिक आणि 13 फेब्रुवारीला मुंबईत सभा घेणार आहे. वेळही फार कमी
आहे आणि मुंबईतील अन्य नेत्यांवर उमेदवार निवडून आणण्यासाठीची जबाबदारी
टाकली आहे.
प्रश्न : उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे नेते आहेत आणि तुमचे चुलत बंधूही? राज
: एक मिनीट...! जो स्वत:च्या जिवावर, शब्दांवर लोकांना निवडून आणू शकतो,
तोच खरा नेता. यांना तर आताही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच सभा
घ्याव्या लागतात. लोक निवडून येतात, ते बाळासाहेबांमुळे. ते महाराष्ट्राचे
नेते आहेत. ते आणि शरद पवार. पण शरद पवारही निवडून आलेल्यांची मोळी बांधून
त्याची दोरी स्वतःच्या हातात ठेवतात. सतत इतर पक्षांतील लोकांना फोडणे हा
राष्ट्रवादीचा जणू कार्यक्रमच आहे. लोक फोडून पक्षाची ताकद वाढत नसते.
प्रश्न : पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी काय सांगाल? राज
: पृथ्वीराज चव्हाण सज्जन आहेत. पण त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध
नाही. वरून आणून बसवलेले ते नेते. कामे होतच नाही त्यामुळे. अजित पवार
यांना खळखळून किंवा नुसते हसतानाचा एकही फोटो मी पाहिलेला नाही. एककल्ली
आहेत ते. त्यांच्यात धमक असू शकेल. पण आपल्या पक्षात आपण एकटेच आहोत आणि
इतर कोणीच नाही, असे त्यांना वाटते. गोपीनाथ मुंडेंविषयी मी म्हणेन की
चक्रव्यूहात असताना प्रत्येकाने स्वतःला "बर्ड आय व्ह्यू'मधून पाहणे गरजेचे
असते. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येते. लेझीम खेळताना दोन पाय पुढे,
दोन पाय मागे टाकले जातात. त्यांना कोणी मागे येणे म्हणत नाही. कारण
मिरवणूक पुढे जात असते.