गुरुवार, 15 नवंबर 2012

काळजीनंतर दिलासा

काळजीनंतर दिलासा
 

-
Friday, November 16, 2012 AT 12:00 AM (IST)

मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची गेल्या काही दिवसांपासून खालावलेली प्रकृती स्थिर असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत, अशी आश्‍वासक घोषणा शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी गुरुवारी संध्याकाळी केली आणि ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर पसरलेले तणावाचे तसेच चिंतेचे वातावरण काही प्रमाणात तरी निवळले. पाठोपाठ उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनीही तशीच ग्वाही दिली असून, लोकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन उद्धव यांनी केले.

दिवाळीत पाडव्याच्या दिवशी, बुधवारी रात्री ठाकरे यांची प्रकृती झपाट्याने बिघडत असल्याचे वृत्त आले आणि मुंबई तसेच राज्यभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. शिवसेनेच्या बहुतेक बड्या नेत्यांबरोबरच एकेकाळचे "शिवसैनिक' छगन भुजबळ आणि बाळासाहेबांचे सुहृद अमिताभ बच्चन यांनीही मध्यरात्रीच्या सुमारास "मातोश्री' या ठाकरे यांच्या निवासस्थानी धाव घेतल्यामुळे वातावरण अधिकच काळजीचे बनले. त्यामुळे गुरुवारी मुंबईचा माहोल भाऊबीज असूनही अगदीच वेगळा होता. अवघ्या मुंबापुरीने काळजीपोटी "अघोषित बंद' पुकारल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. त्यात सकाळीच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मुंबई दौरा रद्द केल्याचे व पाठोपाठ पोलिसांच्या सुट्याही रद्द झाल्याच्या बातम्या आल्या आणि अफवांचे पीक आले.

पण देसाई यांनी गुरुवारी संध्याकाळी बाळासाहेब औषधोपचाराला प्रतिसाद देत असल्याचे जाहीर करताच, "मातोश्री'वर जमलेल्या हजारो शिवसैनिकांचा नूरच पालटला आणि त्यांनी एकसाथ "गणपती बाप्पा मोरया!'चा गजर सुरू केला. "दवा आणि दुवा यांचा हा परिणाम आहे,' असे देसाई यांनी सांगितले.
त्यापूर्वी बुधवारी रात्रीपासूनच तेथे मोठ्या संख्येने केवळ मुंबईतीलच नव्हे तर राज्याच्या अन्य भागांतूनही बाळासाहेबांचे चाहते जमा होऊ लागले होते. पण त्यांना अधिकृत माहिती काहीच मिळत नव्हती, तरी नेहमीचा उफाळणारा शिवसैनिक स्तब्ध उभा राहून, मूकपणे "मातोश्री'कडे नजर लावून तासन्‌ तास उभा होता. त्यात महिलांची संख्या तर लक्षणीय होती. या चाहत्यांमध्ये मशिदीतील जपमाळ घेतलेले काही मुस्लिम आणि तुळशीच्या माळा घातलेली मराठी माणसेही प्रार्थना करताना दिसत होती. सगळेच वातावरण सद्‌गदित करणारेच होते. पण संध्याकाळनंतर वातावरण आशादायी बनले आणि सगळ्यांनीच बाळासाहेबांच्या प्रकृतीला आराम पडो, अशा प्रार्थना सुरू केल्या. मुंबई आणि राज्याच्या अन्य काही भागांतील "बंद'ही निवळत गेला आणि वातावरण सुरळीत होत गेले.

तत्पूर्वी, प्रचंड पोलिस बंदोबस्त असतानाही बुधवारी मध्यरात्रीपासून वातावरणात तणाव होता; मात्र कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पहाटे दोन वाजता शिवसैनिकांना शांततेचे आवाहन करीत शिवसेनाप्रमुखांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. "मातोश्री'बाहेर येणाऱ्या शिवसेनेच्या नेत्याने अथवा पदाधिकाऱ्याने बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगताच शिवसैनिक जल्लोष करत होते. "बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद'च्या घोषणा देत होते. त्यातही "एकच साहेब, बाळासाहेब' ही घोषणा अधिक लक्षवेधी ठरत होती.

"मातोश्री'वरून आलेल्या नेत्यांचा "बाईट' घेण्यासाठी इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांची धावपळ सुरू होती; मात्र शिवसेनाप्रमुख "स्टेबल' एवढीच प्रतिक्रिया मिळत होती. कलानगरला गडकोटाचे स्वरूप आले होते. आत काय घडतेय, याची काळजी प्रत्येकालाच होती.

"मातोश्री'वर रीघ
राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजप अध्यक्ष नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, उद्योगपती राहुल बजाज, उद्योगपती वेणुगोपाल धूत, शिवसेना नेते मनोहर जोशी, चंद्रकांत खैरे, प्रदीप जैस्वाल, एकनाथ शिंदे, अनंत गिते, विनोद तावडे, हुसेन दलवाई, साबीर शेख, आनंदराव अडसूळ, अनिल देसाई, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, गणेश नाईक, सरदार तारासिंग, बॉबी बिंद्रा, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, नाना पाटेकर, संजय दत्त, सलीम खान, सलमान खान, अरबाज खान, मधुर भांडारकर, महेश मांजरेकर, मनोजकुमार, राज बब्बर, रणधीर कपूर, हरिहरन, गोविंदा, विक्रम गोखले, रमेश देव, अजिंक्‍य देव, विनय आपटे यांच्यासह अनेक राजकीय नेते, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी "मातोश्री'वर आले होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बाळासाहेबांची जातीने विचारपूस केल्यावर "उदो हो उदो! बाळासाहेब यातून बाहेर निघतील... त्यांना आई जगदंबेचा आशीर्वाद आहे....' अशी ग्वाही दिली.

ओबी व्हॅन फोडली
बुधवार संध्याकाळपासूनच "मातोश्री'च्या दिशेने शिवसैनिकांची पावले वळू लागली. त्यातच एका वृत्तवाहिनीने शिवसेनाप्रमुख अत्यव्यस्थ अशी बातमी प्रसिद्ध केल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी त्या वृत्तवाहिनीची ओबी व्हॅन फोडली. शिवसैनिकांच्या गर्दीमुळे "मातोश्री' परिसरातील रस्त्यांवर चक्का-जाम झाला होता. गुरुवारी पहाटे अडीचनंतर येथील गर्दी ओसरू लागली.



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें