बुधवार, 31 जुलाई 2013

म्हणे मुंबई वेगळी करा !

मुंबई - तेलंगण राज्याच्या निर्मितीच्या घोषणा झाल्यावर प्रख्यात लेखिका शोभा डे यांनी "मग मुंबई का वेगळी नको?' अशी प्रतिक्रिया वादग्रस्त ट्‌विटरद्वारे व्यक्‍त करताच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करा, असे वादग्रस्त ट्‌विट शोभा डे यांनी केले. शोभा डे यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्राच्या सर्वत्र सर्व भागांतून जोरदार टीका सुरू झाली आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी तब्बल 105 हुतात्मे झाले. त्यासाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ महाराष्ट्रातील लोकांना करावी लागली. हा इतिहास बाजूला सारून शोभा डे यांनी हुतात्म्यांचा अपमान केला असल्याची प्रतिक्रिया व्यक्‍त झाली आहे.
 शोभा डे यांनी, "महाराष्ट्र ऍण्ड मुंबई??? व्हाय नॉट? मुंबई हॅज ऑल्वेज फॅन्सिड इटसेल्फ ऍज ऍन इंडिपेंडंट एन्टिटी. एनी वे, धिस गेम हॅज काऊंटलेस पॉसिबलिटिज' (महाराष्ट्र आणि मुंबई? मुंबईने नेहमीच आपले वेगळेपण दाखवून दिले आहे. अर्थात, हा मोजता न येणाऱ्या शक्‍यतांचा खेळ आहे.) असे ट्विट केले होते. त्यावर राज ठाकरे यांनी मुंबई वेगळी करणे हे "घटस्फोट" घेण्याइतके सोपे नाही, अशी टीका केली, तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शोभा डे यांच्यावर महाराष्ट्रद्रोहाचा खटला भरणे आवश्‍यक असल्याची आक्रमक प्रतिक्रिया दिली. ज्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही, अशा लोकांकडूनच अशी प्रतिक्रिया येऊ शकते, असे ते म्हणाले. मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीमागे मोठा इतिहास आहे. त्यासाठी 105 हुतात्मे झाले. अशा प्रकारचे वक्तव्य करण्यापूर्वी शोभा डे यांनी हा इतिहास वाचायला हवा होता, असे नवाब मलिक म्हणाले.
 'निवडणुका जवळ आल्या की असे (तेलंगणची स्थापना) सवंग लोकप्रियतेचे निर्णय आणि घोषणा होतात. त्याची खिल्ली उडविण्यासाठी आपण ही प्रतिक्रिया दिली आहे. मला महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी नको आहे. '' - शोभा डे, लेखिका

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें