शनिवार, 12 अक्तूबर 2013

राज आणि उद्धव एकत्र येऊ शकतात

रविवार, 13 ऑक्टोबर 2013 - 03:30 AM IST 

मुंबई - राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. कॉंग्रेसच्या पराभवासाठी राज आणि उद्धव एकत्र येऊ शकतात, असे सूचक उद्‌गार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी शुक्रवारी काढले. दादरच्या खांडके बिल्डिंग नवरात्रोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते.

या मुलाखतीत शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासंबंधात बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वगुणांबद्दल शंका उपस्थित केल्याने वादळ उठले आहे. त्या मुलाखतीतच त्यांना राज आणि उद्धव येत्या निवडणुकीत एकत्र येऊ शकतात, असे सूचक विधानही केले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत आणि विभागप्रमुख सदा सरवणकर व्यासपीठावर उपस्थित होते.

दक्षिण-मध्य मुंबईच्या उमेदवारीवरून कोंडी झाल्याने आणि दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याच्या पार्श्‍वभूमीवर जोशी या मुलाखतीमध्ये स्फोटक व्यक्तव्ये करतील असा अंदाज होता; तो जोशी यांनी खरा ठरवला.

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते; हेच स्मारक जर प्रबोधनकार ठाकरे यांचे बांधायचे असते आणि सरकारने टाळाटाळ केली असती; तर स्मारकासाठी बाळासाहेबांनी प्रसंगी सरकारही पाडले असते,' असे परखड मत व्यक्त करीत "कदाचित सध्याचे कॉंग्रेसचे सरकार योग्य प्रतिसाद देईल, असे उद्धव ठाकरेंना वाटले असेल,' अशी भूमिका त्यांनी घेतली. बाळासाहेब जी भाषा वापरत, ती सध्याचे नेतृत्व वापरत नाही. ती आक्रमकता विसरल्याने अनेक समस्या निर्माण झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. अर्थात, ही टीका नसून बाळासाहेब आणि उद्धव या दोन नेतृत्वांतील तुलना असल्याचे सांगायला ते विसरले नाहीत.

बाळासाहेबांच्या धोरणांमध्ये सातत्य होते. उद्धवही त्याच शिवसेनेचा वारसा पुढे नेत आहेत; मात्र शिवसैनिकांमध्ये पूर्वीची आक्रमकता राहिली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी उद्धव यांनी आंदोलन केल्यास त्यामध्ये सहभागी होणारा पहिला शिवसैनिक मी असेन, असेही त्यांनी लगोलग जाहीर केले.

निवडणुकीच्या राजकारणातून अद्याप माघार घेतली नसल्याचे सांगत दादरमधून संधी नाही मिळाली; तर ठाण्यातून निवडणूक लढवण्यास मी तयार आहे, असे जोशी यांनी जाहीर केले. दादरमध्ये बाहेरील उमेदवार दिल्यानेच पराभव पत्करावा लागला. जेथे शिवाजी असतो, तिथे सूर्याजी पिसाळही असतो, असे सांगत दादरच्या पराभवाला स्वतः जबाबदार असल्याचे जोशी यांनी नाकारले.

गेल्या विधानसभेत पक्षाबरोबर गद्दारी करणाऱ्यांना प्रमोशन दिले जात असल्याबद्दल त्यांनी टीकेचा सूरही लावला. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. त्यामुळे कॉंग्रेसच्या पराभवासाठी राज-उद्धव एकत्र येतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, खासदार राऊत यांनी मात्र पक्षनेतृत्वावरच सर्व जबाबदारी टाकण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला. शिवसैनिक आदेशाची वाट पाहत नाहीत. प्रमुखांच्या आदेशांची त्यांना गरज नाही. देशाला वंदनीय असलेल्या नेत्याचे चिमूटभर स्मारक होत नसल्याने आपण त्यांची लेकरे म्हणवून घेण्यास नालायक ठरतो, असेही ते या वेळी म्हणाले.

"मनमोकळी चर्चा झाली' शिवसेनेच्या सध्याच्या नेतृत्वावर म्हणजेच उद्धव ठाकरेंवर टीका केलेली नाही, असे स्पष्टीकरण मनोहर जोशी यांनी आज दिले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. मी कोणत्या संदर्भात आणि नेमके काय वक्तव्य केले, याची माहिती मी उद्धव ठाकरेंना दिली. या वेळी आमची मनमोकळी चर्चा झाली, अशी माहितीही जोशी यांनी दिली.

शिवसैनिक सरांना माफ करणार नाहीत - कदम जोशी यांनी थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केल्याने संतापलेले शिवसेनेचे माजी आमदार रामदास कदम यांनी, सरांमुळेच स्मारकाचा विचका झाला अशी टीका केली. त्यांना जर बाळासाहेबांबद्दल आणि त्यांच्या स्मारकाबद्दल एवढा आदर असेल, तर त्यांनी "कोहिनूर'च्या जागेवर स्मारक बांधण्यासाठी जागा का दिली नाही? असा प्रश्‍न कदम यांनी विचारला. उद्धव यांच्याबद्दल नाहक टिकाटिप्पणी झाल्यास सरांना शिवसैनिक माफ करणार नाहीत, असा थेट इशाराच त्यांनी दिला.

"सरांनी स्मारकाचा वाद सुरुवातीपासून वाढवला. आधी आंदोलनाची भाषा करणारे सर नंतर या विषयावर मूग गिळून गप्प बसले. त्यामुळे त्यांना खरोखरच स्मारक बांधण्याचा उत्साह होता की स्मारक होऊ नये यासाठी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला?' असा प्रश्‍नही कदम यांनी उपस्थित केला.

बाळासाहेबांशी कुणाचीच तुलना शक्‍य नाही - तावडे बाळासाहेबांच्या नेतृत्वाशी कोणाचीच तुलना होऊ शकत नाही, अशी भूमिका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आज घेतली. मनोहर जोशी यांनी केलेले वक्तव्य म्हणजे उद्धव ठाकरेंवरील टीका असल्याचे त्यांनी नाकारले. बाळासाहेबांचे नेतृत्व इतके उत्तुंग होते, की त्यांच्याशी अन्य कोणाचीच तुलना होऊ शकत नाही असे ते म्हणाले.

शिवरायांच्या मावळ्यांप्रमाणे बाळासाहेबांनी शिवसैनिकांवर जिवापाड प्रेम केले, अशा शब्दांत त्यांनी बाळासाहेबांचे कौतुक केले. परळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे "आठवणीतले बाळासाहेब' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. 1988-89 या काळात मी विद्यार्थी संघटनेचे नेतृत्व करीत असताना प्रमोद महाजन यांच्यासोबत "मातोश्री'वर गेलो होतो. त्या वेळी बाळासाहेबांच्या बहुआयामी नेतृत्वाचा अनुभव आला, अशी आठवण तावडे यांनी सांगितली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें