शुक्रवार, 21 अप्रैल 2017

तुम्ही माझी भूमिका लोकांपर्यंत पोचवण्यात कमी पडलात - राज ठाकरे

मुंबई - महापालिका निवडणुकींचा माहोल पार पाडल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पराभवाचे, चुकांचे चिंतन करण्यासाठी बैठक पार पडली. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
मी मांडलेली भूमिका लोकांपर्यंत पोचविण्यात तुम्ही कमी पडलात, असा ठपका राज ठाकरे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांवर ठेवण्यात आल्याचे कळते, तर उमेदवार निवडीच्या प्रक्रियेबाबत पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदविल्याचे कळते. राज ठाकरे यांच्या "कृष्णकुंज' या निवासस्थानी गुरुवारी पक्षाचे नेते, सरचिटणीस यांची बैठक बोलवण्यात आली होती. सुमारे दोन तास ही बैठक चालली. महापालिकेतल्या पराभवाबाबत नेते, सरचिटणीस यांनी पहिल्यांदाच राज यांच्यासमोर त्यांची परखड मते मांडल्याचे कळते. या वेळी पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांवर तुमच्याकडून पक्षाची भूमिकाच येत नाही, असे मत मांडल्याचे कळते.
त्यावर राज ठाकरे यांनी मी भूमिका मांडतो; पण तुम्हीच माझ्या भूमिका लोकांपर्यंत पोचवायला कमी पडत आहात, असे सांगितल्याचे कळते. पक्षाच्या कार्यकर्त्यांची आता भावना आहे, आता आपण मराठीप्रमाणेच अन्य भाषिकांनाही जवळ केले पाहिजे, असे पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांना सांगितले. त्यावर राज ठाकरे यांनी मी मराठीचा मुद्दा असा सोडू शकत नाही, भले मला लोकांनी मते देऊ देत किंवा नकोत, असे सांगितल्याचे कळते. निवडणुकीत पक्षाचे उमेदवार ठरविताना राबवण्यात आलेल्या काही प्रक्रियांवरही नेत्यांनी आक्षेप नोंदवल्याचे कळते. दरम्यान, निवडणुकीतील पराभवाला पक्षात जबाबदार कोण याबाबत या बैठकीत काहीच स्पष्टता झाली नसल्याचे कळते. पक्षात आता अध्यक्ष, नेते, सरचिटणीस आणि कार्यकर्ते असे सरळ तीन गट पडल्याचेही बैठकीतून पुढे आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें