बुधवार, 14 अप्रैल 2010

मनसेच्या चार आमदारांचे निलंबन मागे घेणार?

मनसेच्या चार आमदारांचे निलंबन मागे घेणार?
सकाळ वृत्तसेवा
Thursday, April 15, 2010 AT 12:00 AM (IST)


मुंबई - समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना विधिमंडळात चोप दिल्याने निलंबनाला सामोरे जावे लागलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चार आमदारांविरुद्धचे निलंबन या अधिवेशनात मागे घेतले जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

मनसेचे आमदार शिशिर शिंदे, राम कदम, वसंत गीते व रमेश वांजळे यांना चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. आमदारकीची शपथ घेतल्यानंतर काही वेळातच ही कारवाई झाली होती. हिंदीतून शपथ घेणाऱ्या आझमी यांनी मराठीतूनच शपथ घ्यावी, यासाठी मनसेच्या आमदारांनी सभागृहात अभूतपूर्व गोंधळ घालत, अबू आझमीला सभागृहातच चोप दिला होता.

निलंबन मागे घ्यावी, अशी विनंती मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी केली होती. परंतु अशा अभूतपूर्व गोंधळानंतर अध्यक्षांनी कारवाई मागे घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे या चारही आमदारांना नागपूर येथील हिवाळी अधिवेशन व सध्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होता आले नाही. हिवाळी अधिवेशनातही या चार आमदारांनी निदर्शने करून निलंबन मागे घेण्याची मागणी केली होती. चारही आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, यासाठी मनसेकडून मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांकडे सातत्याने विनंती सुरू आहे. महसूल मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातूनही निलंबन मागे घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते.

मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षांनी याबाबत काही प्रमाणात अनुकूलता दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे. चौघांचे निलंबन याच अधिवेशनात मागे घेण्यासाठी मनसेच्या अन्य आमदारांचा विशेष प्रयत्न सुरू असल्याचे समजते. त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच ठराव मांडून मनसेच्या चार आमदारांचे निलंबन मागे घेतले जाणार असल्याचे विधान भवनाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें