सोमवार, 28 मार्च 2011

मनसे'च्या कार्यकर्त्यांची महापालिकेत तोडफोड

मनसे'च्या कार्यकर्त्यांची महापालिकेत तोडफोड
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, March 29, 2011 AT 12:30 AM (IST)
 
नांदेड - नळाद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याचा तक्रारी देऊनही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. 28) दुपारी साडेबाराच्या सुमारास पाणीपुरवठा विभागावर हल्लाबोल करून तोडफोड केली.

शहरातील गणेशनगर भागातील गणेश मंदिर ते प्राथमिक शाळा या रस्त्यावरील घरांमध्ये नळाद्वारे पिण्याच्या पाण्यासोबत ड्रेनेजचे पाणी येत असल्याच्या तक्रारी या भागातील रहिवाशांनी केल्या होत्या. गेल्या आठ दिवसांपासून असे पाणी येत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे होते. या भागातील पाइपलाइन बदलावी, अशी मागणीही करण्यात आली होती; मात्र याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले. अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सांगूनही उडवाउडवीची उत्तरे मिळाली. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनोद पावडे, पप्पू मनसुके, सय्यद फारूख, अच्युत जगताप, दत्ता घुमशेटवार, अनुप आगाशे, अनिल कदम, राजेश अन्नदाते यांच्यासह इतर चाळीस कार्यकर्ते सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास महापालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयात आले. या वेळी सहायक आयुक्त प्रकाश येवले आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यशवंत गच्चे आणि उपअभियंता भागानगरे कुठे आहेत? अशी विचारणा या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे केली. श्री. येवले यांनी गच्चे यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणे करून दिले. त्यावर मनसेचे पदाधिकाऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी ड्रेनेजमिश्रित पाणीही सोबत आणले होते. संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी गच्चे यांच्या खुर्चीला या ड्रेनेजमिश्रित पाण्याने स्नान घातले आणि घोषणाबाजी सुरू केली. काही कार्यकर्त्यांनी कार्यालयातील फाईल, संचिका फेकण्यास सुरवात केली. टेबलवरील काच फोडण्यात आला. खुर्च्या तोडण्यात आल्या. काही खुर्च्यांची फेकाफेक करण्यात आली. टेबलही उचलून फेकण्यात आले. संगणकाचीही मोडतोड करण्यात आली. जोरदार घोषणाबाजी करीत सर्वजण घटनास्थळाहून निघून गेले. या प्रकाराने काही काळ महापालिकेत गोंधळ झाला.

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील देशमुख व इतर पोलिसांनी तेथे धाव घेतली. पाणीपुरवठा विभागात फाईली, संचिका अस्ताव्यस्त पडल्या होत्या. सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. टेबल-खुर्च्या आणि संगणकाची मोडतोड झाली होती. कार्यकारी अभियंता गच्चे यानंतर तेथे आले.

एक लाखाचे नुकसान
"मनसे'च्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यात शासकीय मालमत्तेचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी सहायक आयुक्त येवले यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें