शनिवार, 14 सितंबर 2013

राज ठाकरे-मुख्यमंत्री पाऊण तास चर्चा

रविवार, 15 सप्टेंबर 2013 - 02:30 AM IST 

मुंबई - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात आज बंद दरवाजाआड सुमारे पाऊण तास चर्चा झाली. राज यांनी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मुख्यमंत्री चव्हाण यांची त्यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी भेट घेतली. या वेळी त्यांच्या सोबत "मनसे'चे आमदार प्रवीण दरेकर होते. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर दरेकर काही मिनिटांतच खोलीतून बाहेर पडले. त्यानंतर राज आणि मुख्यमंत्री चव्हाण यांच्यात तब्बल 45 ते 50 मिनिटे चर्चा झाली. चर्चेचा तपशील समजला नसला, तरी नाशिकमध्ये होणारा आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि "मनसे'ची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेची कामगिरी या विषयांवर चर्चा झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींची काल (शुक्रवारी) झालेली घोषणा, त्यांना शिवसेनेने दिलेला पाठिंबा, भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांचा मुंबई दौरा या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यातील चर्चेविषयी तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

भूमिपुत्रांनाच टॅक्‍सी परवाने द्या राज्यात नव्याने दिले जाणारे टॅक्‍सी परवाने येथील भूमिपुत्रांनाच द्यावेत, अशा मागणीचे निवेदन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आज दिले. या वेळी त्यांच्यासोबत आमदार प्रवीण दरेकर होते. "सह्याद्री' विश्रामगृहावर मुख्यमंत्र्यांची आज सायंकाळी ठाकरे यांनी भेट घेतली. राज्यात नव्याने 9 हजार रिक्षा आणि टॅक्‍सी परवाने दिले जाणार आहेत. हे परवाने देताना सरकारने मराठी तरुणांना येथील भूमिपुत्रांनाच प्राधान्य दिले पाहिजे. परवाने जास्तीत जास्त मराठी तरुणांना दिले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाशी चर्चा करून याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्‍वासन दिले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें