मंगलवार, 12 सितंबर 2017

कल्याण-डोंबिवली मनपाने श्वेतपत्रिका काढावी : मनसेची मागणी


कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या नाजूक आर्थिक स्थितीमुळे विकास कामांना खीळ बसली आहे. नव्याने कोणतीही कामे करण्याची पालिकेची ऐपत नसल्याने पालिकेने आपल्या स्थितीची श्वेतपत्रिका काढावी अन्यथा नागरिकांबरोबर आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असे पत्र पालिकेचे विरोधी पक्ष नेते मंदार हळबे यांनी आयुक्त पी वेलारसू यांना पाठवले आहे.
पालिकेचा अर्थ संकल्प तयार करताना करण्यात येत असलेल्या चुकांमुळे आज स्पील ओव्हरचा आकडा वाढत आहे. पालिकेतील लोकप्रतिनिधींना कामे होत नसल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते, या श्वेतपत्रिकेमुळे आर्थिक स्थिती नागरिकांनाही समजेल अशी अपेक्षा मंदार हळबे यांनी व्यक्त केली. प्रशासकीय यंत्रणा समय सूचकतेचा वापस न करता कामे करत आहेत. नविन अर्थसंकल्प तयार करताना कलम 102 नुसार सरत्या वर्षातील अखर्चिक रकमांना पुन्हा मंजुरी घेतली जात नसल्याची बाबही त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे. याच कारणाने प्रशासन सादर करत असलेला अर्थ संकल्प वस्तूस्थितीला ध्रुव नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कचरा, पाणी पुरवठा, आरोग्य अशी अनेक कामे ठेकेदार सोडून देण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. या ठेकेदारांना त्यांच्या कामाची देयके वेळेत मिळत नसल्याने ही परिस्थिती उदभवू शकते असे त्यांचे म्हणणे आहे. जर अशी परिस्थिती आली तर पालिका क्षेत्रातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. सत्ताधाऱ्यांनी अर्थ संकल्प फुगवला असे सांगत आता आरोप प्रत्यारोपांचा खेळ शासन प्रशासन करत असल्याचा गंभीर आरोप हळबे यांनी केला आहे. प्रशासनाने श्वेतपत्रिका काढण्यास टाळाटाळ केली तर विरोधी पक्ष म्हणून आपल्याला नागरिकांबरोबर आंदोलनाचा पावित्रा स्वीकारावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें