गुरुवार, 14 सितंबर 2017

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत राज ठाकरेंचं शाळा-महाविद्यालयांना पत्र

मुंबई : गुरुग्राम येथील सात वर्षीय प्रद्युम्न या विद्यार्थ्याच्या हत्येनंतर रायन इंटरनॅशनल स्कूलच्या देशभरातील शाखा पालकांच्या निशाण्यावर आल्या. विविध ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत अनेकदा निष्काळजीपणा झाल्याचं दिसून येतं. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळा-महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत तडजोड करु नये, असं आवाहन केलं आहे.
देशाचे भावी आधारस्तंभ असणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थींनींचं लैंगिक शोषण झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. या घटनांमुळे मान शरमेने खाली गेली आहे. शिवाय या शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सरकार याबाबतीत गंभीर दिसत नाही, त्यामुळे मी स्वतः पत्र लिहून संवाद साधत आहे, असं राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे.
शैक्षणिक संस्थांचे सुरक्षिततेविषयीची कारणं वेगवेगळी असू शकतात. मात्र कोणतंही कारण न देता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे सर्व निकष पूर्ण करावेत. यासाठी जी काही पावलं उचलावी लागतील ती अग्रक्रमाने उचलावीत, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.

या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला तर मनसे सर्व शाळा-महाविद्यालयांच्या मागे खंबीरपणे उभा राहिल. मात्र तुम्ही जबाबदारीपासून पळ काढत आहात किंवा पालकांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र नाहीत, असं आढळून आलं तर ते कदापि सहन केलं जाणार नाही, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.
राज ठाकरेंचं शाळा-महाविद्यालयांना पत्र
 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें