गुरुवार, 9 फ़रवरी 2012

सुप्रीम कोर्टात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न - राज

सुप्रीम कोर्टात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न - राज
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, February 09, 2012 AT 02:00 AM (IST)

पुणे - ""सभेसाठी शिवाजी पार्कचे मैदान मिळू शकणार नाही, या उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत पाच दिवसानंतरही मिळालेली नाही.
यातून, सर्वोच्च न्यायालयात जाण्यास रोखण्याचा प्रयत्न दिसतो,'' असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
"रोड शो'मुळे आचारसंहितेचा भंग झाल्याच्या प्रश्नावर त्यांनी "निवडणूक आयोगाने 1995 पासून काय "शूटिंग' केले आहे, ते मला पाहायचेय. त्यात, किती जणांना शिक्षा झाली. अन्य कोणी निवडणुकीचे कायदे मोडले नाही का,' असे उत्तर दिले.

पुणे महापालिका निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाकरे यांचा "रोड शो' झाला. त्यानंतर, त्यांनी ही भूमिका मांडली. ते म्हणाले, ""आज गल्ली बोळात रुग्णालये झाली आहेत. प्रत्येक ठिकाणी "सायलेन्स झोन' केला, तर सभा, कार्यक्रम घ्यायचे कोठे? निवडणुकीच्या कालावधीत तरी जाहीर सभांना परवानगी मिळायला हवी. मैदान उपलब्ध करून द्यायचे नाही आणि रस्त्यावर सभा घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणे म्हणजे विचारस्वातंत्र्य व्यक्त करण्यावरच मर्यादा घालण्याचा प्रकार आहे. शिवाजी पार्क संदर्भात न्यायालयाने दिलेला निर्णय पटण्यासारखा नाही. कायद्याचा आणि या निर्णयाचा संबंध नाही. तसेच, राज्य सरकारने या संदर्भात न्यायालयात मांडलेली बाजू दुजाभाव करणारी आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर अद्यापही सही झालेली नाही. याबाबत काय बोलायचे?''

कोणाला परप्रांतीयांच्या मागे जायचे असेल तर त्यांनी जावे, मी मात्र मराठी माणसाच्या मागेच जाणार, असे ठाकरे यांनी एका प्रश्‍नाला उत्तर दिले. ते म्हणाले, ""महाराष्ट्रातील शहरातील मराठीचा टक्का कमी करण्याचे षड्‌यंत्र सुरू आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकीसाठी सध्या मुंबईतून रेल्वे भर भरून जात आहेत. ही लोक तिकडे जाऊन मतदान करणार आणि पुन्हा इकडे येऊन मतदान करणार आहेत. त्यांच्यावर कोणतेच बंधन नाही.''

माझे थोबाड पुरेसे आहे
पुण्यातील प्रचारासाठी माझे थोबाड पुरेसे आहे, असे राज ठाकरे यांनी एका प्रश्नावर सांगितले. "पुण्यात एकहाती सत्ता द्या,' या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मागणीवर त्यांनी "राज्य सरकारमध्ये असताना विकासकामे करण्यासाठी त्यांना बहुमताची गरज काय,' असा सवाल केला. मुंबई, ठाणे, नाशिक व पुणे या शहरांचे काही मूळ प्रश्न आहेत. त्यात, मी हात घालणार आहे, असे ते म्हणाले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें