शुक्रवार, 10 फ़रवरी 2012

अजितदादांनी केला पुण्याचा विचका - राज ठाकरे

अजितदादांनी केला पुण्याचा विचका - राज ठाकरे
- सकाळ वृत्तसेवा
Saturday, February 11, 2012 AT 02:00 AM (IST)
  
पुणे - भाजप-शिवसेना आणि नंतर कॉंग्रेस अशी सर्व प्रकारच्या पक्षांशी आघाडी करणाऱ्या अजितदादांनी शहराचा विचका केला असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी "सकाळ'ला खास मुलाखत देताना केली.

"राज्यातील सर्व शहरांचे मूलभूत प्रश्‍न उग्र बनले असून, त्याकडे राज्यकर्त्यांना लक्ष देण्यास वेळ नाही. त्यामुळे शहरे वाढली म्हणजे त्यांना सूज आलेली आहे. वाहतूकयंत्रणा आणि अन्य सुविधांमध्ये वाढ न होता केवळ इमारतीच वाढल्या आहेत. अशा विकासाला परवानगी दिलीच कशी जाते,' असा सवाल ठाकरे यांनी केला.

""शहरातील पंधरा टक्के जागा रस्त्यांसाठी असली पाहिजे; मात्र प्रत्यक्षात केवळ सहाच टक्के जागा रस्त्यांसाठी मिळाली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होणारच. सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सुधारली पाहिजे; मात्र वाहन उत्पादक कंपन्या हे होऊच देत नाहीत. पैसे पेरून सार्वजनिक वाहतूक यंत्रणा दुबळी कशी राहील, ते पाहिले जाते,'' असा आरोपही ठाकरे यांनी केला. "बीआरटीसारखी योजना गुजरातमध्ये कशा प्रकारे राबविली जात आहे ते पाहा,' असे आवाहनही त्यांनी केले.
""पुणे हे विद्येचे माहेरघर आहे; पण ही विद्या इथल्याच विद्यार्थ्यांना द्या, बाहेरून विद्यार्थ्यांना बोलावून त्यांना विद्या देऊ नका,'' असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. अशा गोष्टींमुळे पुण्याची लोकसंख्या वाढत असून, पाण्यासारख्या नागरी सुविधा अपुऱ्या पडत आहेत. "एसटी ही आपल्या राज्यासाठी असेल तर मग पुणे-उदयपूर बस का सुरू केली जाते,' असा सवालही त्यांनी केला.

पुण्याकडे अजित पवारांचे लक्ष नसल्याचा आरोप करून ठाकरे म्हणाले, की त्यांचे लक्ष दुसरीकडेच कुठेतरी असते. मुळा-मुठा नदीचे घाणेरडे स्वरूप कसे बदलणार, याचा आराखडा राज्यकर्त्यांनी केला आहे; मात्र तो लोकांना कधी दाखवणार ? त्यांचे म्हणणे कधी ऐकणार? केवळ पैसे मंजूर केले जातात; प्रत्यक्ष काय होणार, ते कोणाला माहीत नसते. कचरा डेपोचा प्रश्‍न आपल्याकडेच का निर्माण होतो ? परदेशात दुर्गंधी न पसरता कचरा डेपो उभारला जातो. असे असेल तर मग आपणच काय घोडे मारले आहे ? आपल्याकडे असे तंत्रज्ञान आणले पाहिजे.

गुजरातप्रमाणे आपल्या राज्याचा विकास करायचा असेल तर मनसेकडे राज्याची आणि महापालिकांची एकहाती सत्ता सोपवा असे आवाहन करून ठाकरे म्हणाले, की गुजरातमध्ये राज्य आणि महापालिका यांच्यात उत्तम समन्वय आहे. सातत्याने हे पक्ष निवडून येत असल्याने ते मतदारांना गृहीत धरतात. तेच तेच राजकारणी मतदारांनी आता नाकारावेत. मनसेला संधी दिल्यास आतापर्यंत रखडलेली कामे किमान सुरू केली जातील, असे आश्‍वासन आपण देतो, असेही ठाकरे यांनी सांगितले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें