शनिवार, 11 फ़रवरी 2012

मोगलाई असल्याचा सत्ताधाऱ्यांचा भ्रम मोडून काढा- राज ठाकरे

मोगलाई असल्याचा सत्ताधाऱ्यांचा भ्रम मोडून काढा- राज ठाकरे



प्रतिनिधी, पुणे, रविवार, १२ फेब्रुवारी २०१२
altठराविक उद्योजकांना फायदा देण्यासाठी पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारली जात नाही. शहरात शिक्षणाचा धंदा सुरू असून, हे शहर विद्यानगरी नव्हे, तर डोनेशननगरी झाली आहे.
येथील सत्ताधारी मात्र केवळ जमिनी विकत घेणे व पैसे कमाविण्याचे काम करीत आहेत. काहीही केले तरी मतदान होते, येथे आमची मोगलाई आहे, हा सत्ताधाऱ्यांचा भ्रम मोडल्याशिवाय ते वठणीवर येणार नाहीत, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसवर तोफ डागली.
पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची आज सभा झाली. शहरातील विविध प्रश्नांना हात घालत सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला. उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुरेश कलमाडी यांचाही त्यांनी समाचार घेतला. त्याचप्रमाणे गुजरातमधील विकासकामांचे नेहमीप्रमाणे कौतुक करीत आपला महाराष्ट्र व शहरात तसा विकास का होऊ शकत नाही, असा प्रश्न करीत शहरे चांगली करणे ही माझी पॅशन असून, त्यासाठी महापालिकेत सत्ता द्या, असे आवाहन केले. अजित पवारांचा उल्लेख करून ठाकरे म्हणाले की, पवार म्हणतात आमच्या हातात सत्ता द्या, तरच कामे करू. त्यांच्या हातात राज्य आहे, तरी शहरांची वाताहात का झाली? पवार व पृथ्वीराज चव्हाण यांचे विमान २५ हजार फुटांवरून चालले आहे. राज्य हातात असताना त्यांना पालिका हवी आहे. कामे कशी केली जातात, यासाठी त्यांना नरेंद्र मोदींकडे शिकायला पाठविले पाहिजे. आमच्या सत्ताधाऱ्यांना केवळ त्यांच्या जमिनी वाढविण्यात रस आहे. पुण्यात अनेक प्रकल्प रखडले आहेत. ठराविक उद्योगपतींची वाहने विकण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. टेकडय़ांवर अतिक्रमणे होत आहेत. नदीच्या प्रदूषणात वाढ होते आहे. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा उचलताना मोठा पोलीस बंदोबस्त घेतला जातो. असा बंदोबस्त घेऊन अनधिकृत बांधकामे का पाडली जात नाहीत? परदेशातून, बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यांसाठी येथे कॉलेज निघते, पण तुमच्या-आमच्यासाठी नाही. हे सर्व सत्ताधारी केवळ पाहत बसतात.
‘निवडणुकीच्या तोंडावर कलमाडी सुटले कसे?’
मुंबईतील मैदानावर सभा घेण्यास न्यायालयाने परवानगी नाकारल्याचा विषय राज ठाकरे यांनी पुन्हा छेडला. ते म्हणाले,‘‘निवडणुकीच्या सभेसाठी परवानगी नाकारली जाते. पण, निवडणुकीच्या तोंडावर सुरेश कलमाडी सुटतात कसे? कसाब, अफजल गुरूचा निकाल लागत नाही, पण राज ठाकरेला परवानगी द्यायची की नाही, यावर तत्काळ निर्णय होतो.’’ कलमाडी पुण्यात आल्यानंतर झालेल्या स्वागताबाबत ते म्हणाले,‘‘स्वातंत्र्यवीर सावरकरच आले आहेत, असे त्यांचे स्वागत झाले. देशासाठी काही केले म्हणून नाही, तर गैरव्यवहार केला म्हणून ते तुरुंगात होते.’’  

राजची मोटार ‘नो पार्किंग’मध्ये
गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची मोटार बीआरटीमधून जात नसल्याचे जाहीर भाषणात सांगत त्यांचे कौतुक करणाऱ्या राज ठाकरे यांची मोटार मात्र शनिवारी बराच काळ वाहने उभी न करण्याच्या जागी उभी असल्याने वाहतुकीचा नियम मोडला गेला. त्यासाठी पोलिसांनी दंडही वसूल केला. फग्र्युसन रस्त्यावरील वैशाली हॉटेलसमोर ‘नो पार्किंग’मध्ये दुपारी हा प्रकार घडला. राज यांच्या मोटारचालकाकडून शंभर रुपये दंड जमा करण्यात आला

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें