शुक्रवार, 31 जनवरी 2014

काम करायचे नसल्यास चालते व्हा - राज ठाकरे

पुणे - ""सामान्यांच्या उपयोगी न पडता केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून पक्षात राहायचे असेल तर चालते व्हा. समाजासाठी, पक्षासाठी काम करणारी तरुणांची दुसरी टीम माझ्याकडे तयार आहे,'' अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी फटकारले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या दुसऱ्या राज्यस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. कार्यपद्धती व पक्षसंघटन या विषयावरून त्यांनी सर्वच पदाधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ते म्हणाले, ""केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून काम करू नका. सतत लोकांची कामे होती घ्या, त्यांच्या उपयोगी पडा; तरच लोक तुम्हाला विचारतील. जाहीर सभांमधून भाषणे करून मी मते मागायची आणि तुम्ही त्याचा फायदा स्वत:साठी उठवत राहायचे, हे चालणार नाही. लोकांना उत्तर मला द्यावे लागणार आहे. त्यामुळे ज्यांना केवळ स्वत:चे हित साधून घ्यायचे आहे, त्यांनी जागा खाली करा. तरुणांची दुसरी टीम लगेच तयार आहे.''

राज यांनी संघटनेच्या जिल्हानिहाय कामाचा, तसेच निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. ज्यांचे काम चांगले आहे त्यांचे कौतुक करीत, असमाधानकारक काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी फटकारले. निवडणुकीत दरहजारी प्रमुखांची जबाबदारी महत्त्वाची आहे. त्याचबरोबर हजारी प्रमुखाला योग्य मार्गदर्शन आणि मदतीसाठी जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांनी जातीने लक्ष घातले पाहिजे. त्यांची ती जबाबदारी आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्यासाठी सर्व यंत्रणा सक्रिय झाली पाहिजे. जिल्हाप्रमुख व शहरप्रमुखांची यात मोठी जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.

राज यांच्या भाषणाआधी राज्यभरातून आलेले जिल्हाप्रमुख, तसेच शहरप्रमुखांनी आपल्या कामाचा अहवाल सादर केला. या मेळाव्याला आमदार बाळा नांदगावकर, दीपक पायगुडे, अनिल शिदोरे यांच्यासह पक्षाचे सर्व उपाध्यक्ष व सरचिटणीस उपस्थित होते.

पोलिस कारवाई करणार का?
या मेळाव्यासाठी राज ठाकरे यांचे आगमन होताच फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. मात्र यासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले. शेजारीच शाळेचे वर्ग सुरू होते याचे भान न ठेवता विनापरवानगी आतषबाजी करणाऱ्या संयोजकांवर पोलिस कारवाई करणार का, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें